के. के. पाठक यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे यांनी नागपूरमध्ये राबवलेला प्रयोग पुण्यात राबवल्यास गुन्हेगारीला आळा घालण्यास निश्चितच मदत होईल. मात्र, पुण्यात हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, याबाबत शंकाच आहे. कारण नागपूर आणि पुण्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी थांबणार का, हे येणारा काळच ठरवेल.
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी ही पुण्याची ओळख सर्वज्ञातच आहे, शिवाय आयटी शहर असा बहुमानही पुणे शहराकडे चालून आला आहे. यामुळे पुणेकरांची मान अभिमानाने ताठ झाली असली, तरी अलीकडच्या काळात पुणे शहर गुन्हेगारीच्या बाबतीतही मागे राहिलेले नाही.
घरफोडया, सोनसाखळी, वाहनचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. शिवाय दररोज दिवसाढवळ्या एखाद् दुस-या खुनाच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत चालली आहे. पोलीस आयुक्तपदी कुणालाही बसवले, तरी पुण्यातील गुन्हेगारीची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस आयुक्तांना अपयश येत आहे. नागपूर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेले पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची उचलबांगडी करत, त्यांच्यावर पुण्यासारख्या महानगराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचा न लागलेला शोध हे मोठे आव्हान आता पाठक यांच्यासमोर असणार आहे.
नागपुरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांची पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तिथे अपयशी ठरलेले पोलीस आयुक्त देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय साधणार आहेत? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पाठक यांची अधिकारी म्हणून ओळख चांगली आहे. मात्र, त्याचा फायदा पुण्याला होणार का, की पुण्याचीही नागपूरसारखीच परिस्थिती होणार, याबाबत साशंकताच आहे. पाठक हे राज्य पोलीसमध्ये १९८२च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मितभाषी असलेल्या पाठक यांनी आजपर्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र, ते करत असताना त्यांनी पक्षपातीपणा केलेला दिसत नाही.
पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ होती. मात्र, नागपूरमध्ये गुन्हेगारांवर वचक राखण्यात कमी पडलेल्या पाठक यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलेच असणार. पाठक यांच्या पाठीशी दांडगा अनुभव असल्यानेच त्यांची पुण्यात वर्णी लागली असावी. त्यांनी याआधी कोकण रेन्ज, कोल्हापूर रेन्ज, अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन आदी महत्त्वाच्या ठिकाणी काम पाहिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात गुंडाराज चालते, अशी काही वर्षापूर्वी (आजही आहे) परिस्थिती होती. अशा परिस्थितीत कोल्हापूर रेन्ज हाताळणे सोपे काम नक्कीच नव्हते. ते त्यांनी समर्थपणे पेलले.
२०१२मध्ये पाठक नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. नागपूर आयुक्तालय हा काटेरी मुकुट समजला जातो. इथे प्रत्येक अधिका-याची अग्निपरीक्षाच असते. तो अनुभव पाठक यांनाही आला. त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले नसतील, असे नाही. ते त्यांनी केले असतील. मात्र, तेथील परिस्थिती हाताळण्यात त्यांना अपयश आले.
आता त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या वाढलेल्या घटना रोखण्यात गुलाबराव पोळ, सतीश माथूर यांनाही सपशेल अपयश आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचाही अद्याप शोध लागलेला नाही. मारेक-यांना पकडण्याचे मोठे आव्हान पाठक यांच्यापुढे असणार आहे. त्यातच टोळीयुद्धातून अधूनमधून खुनाच्या घटनाही घडत आहेत.
टोळीयुद्ध ही पुण्याची मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे संपूर्ण शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचे मोठे आव्हानही पाठक यांच्यापुढे असणार आहे. दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. मुलींवरील वाढते अत्याचार चिंताजनक ठरत आहेत. घटना घडून कित्येक महिन्यांनंतरही आरोपी मोकाट फिरत आहेत.
गेल्या काही वर्षातील खुनांच्या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही. त्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करणे, तंत्रज्ञानाचा आधार घेणे, खब-यांचे सक्षम जाळे उभे करणे आदी उपाययोजना नूतन पोलीस आयुक्तांना कराव्या लागणार आहेत. शहर आणि परिसरात जमिनीचे भाव वाढल्यामुळे गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जमिनीवर ताबा करून गुंड दहशत पसरवत आहेत. त्यांची दहशत कशी मोडून काढायची, हा यक्षप्रश्न पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे.
सोनसाखळी चोरीच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्रच व्यापला गेला आहे. पुणे, िपपरी-चिंचवड शहरही त्याला अपवाद नाही. या घटना रोखण्यासाठी पाठक यांनी नागपूरमध्ये राबवलेला प्रयोग पुण्यात राबवल्यास फायदा होईल. मात्र, पुण्यात हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, याबाबत शंकाच आहे. कारण नागपूर आणि पुण्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथला प्रयोग पुण्यात कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरवेल. दहशतवाद, जातीय तेढ आणि संघटित गुन्हेगारी रोखण्याचेही मोठे आव्हान आहे.
शहरातील वाहतूक कोंडी तर पाचवीलाच पुजलेली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे जसे समस्त पुणेकरांना जमलेले नाही, तसाच अनुभव पोलीस आयुक्तांना येऊ नये, यासाठी वेगळ्या उपाययोजनांची गरज आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई तर होतच असते.
मात्र, पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी काय करता येईल, याचाही अभ्यास पाठक यांना करावा लागेल. सुरक्षिततेच्या बाबतीत पुणे खूपच मागे आहे. त्यामुळेच पुण्याला तीन वेळा बॉम्बस्फोटांचा आघात सहन करावा लागला. गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांशिवाय वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे.
एकंदरीत नूतन पोलीस आयुक्तांपुढे पुण्यातील एकूणच गुन्हेगारी प्रवृत्तीला सूतासारखे सरळ करण्याचे मोठे आव्हान आहे. ते आव्हान त्यांनी स्वीकारलेही आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पाठक यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांमधील असुरक्षिततेचे वातावरण, मुलींवरील लैंगिक अत्याचार, कायदा सुव्यवस्था, वाहतूक, वाढत्या सोनसाखळी चो-या हे प्रश्न सोडवण्यासाठीची मोठी यादीच तयार केली आहे. पोलीस आयुक्तालयातील पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपले इरादेही स्पष्ट केले आहेत.
‘थोडा वेळ द्या.. पुण्यातील गुन्हेगारी लोखंडी हातांनी चिरडून टाकतो’ अशा शब्दांत गुन्हेगारांना दम भरला. व्हिजिबल पोलिसिंगवर आपला भर राहणार आहे, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याला महत्त्व दिले जाईल, सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलिसांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पूर्वीच्या पोलीस आयुक्तांनी सुरू केलेले उपक्रम व योजना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, याबरोबरच पुणे शहराच्या वाहतुकीचा अभ्यास केल्यानंतर अडचणीच्या ठिकाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ काय उपाययोजना करता येतील, हे पाहिले जाईल.
पोलिसांचे काम हे पारदर्शक ठेवण्यावर भर दिला जाईल. खब-यांचे जाळे वाढवण्यावर भर देऊ, अशी आश्वासने दिली आहेत. पोलीस ठाण्यात एखाद्या पोलीस कर्मचारी किंवा अधिका-याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले, तर त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-याला जबाबदार धरले जाईल, ही महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बीट मार्शलची संख्या वाढवण्याचे पाठक यांनी सूतोवाच दिले आहेत. ते प्रत्यक्षात आल्यास त्याचे महिलावर्गातून स्वागतच होईल. पोलीस ठाण्यात एखाद्या कर्मचा-याने लाच घेतल्याचे आढळल्यास तेथील वरिष्ठ निरीक्षकास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. तसेच, त्या कर्मचा-यालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता या केवळ घोषणाच राहतात, की त्या प्रत्यक्षात येऊन पुण्याची जुनी ओळख ‘शांत पुणे’ अशी करण्यात के. के. पाठकांना यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.