महाराष्ट्रातील असंख्य घरांच्या खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरिबांच्या ओटी-ओसरीपर्यंत ‘गंगा यमुना डोळय़ांत उभ्या का?’ व ‘बाळा होऊ कशी उतराई’सारख्या मधुर आणि बाळबोध गीतांनी मायलेकींपासून लहानथोरांपर्यत सा-यांना मोहवून टाकणारे ‘जनकवी’ पी. सावळाराम यांचा आज जन्मदिन. दि. ४ जुलै १९१४ रोजी येडे निपाणी या सांगली जिल्ह्यातील गावी जन्मलेले हे निवृत्तीनाथ रावजी पाटील. पण वि. स. पागे यांनी त्यांचे ‘सावळय़ा’ असे नामकरण केले, आणि ते झाले, पी. सावळाराम!
भक्तिगीते, भावगीते, गवळण, लावण्या, चित्रपटगीते असे सर्व प्रकार हाताळणा-या सावळारामांना खरी लोकप्रियता लाभली ती ‘गंगा यमुना..’ मुळे. त्यांच्या ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ या गीताने सासरी पाठवणी झाली नाही, अशी महाराष्ट्रीय युवती सापडणे कठीण. ‘लिंबलोण उतरता..’, ‘सप्तपदी मी रोज चालते’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘घट डोईवर..’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा..’ यांसारखी असंख्य अविस्मरणीय गीते लिहिणा-या पी. सावळारामांना कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘जनकवी’ हा किताब दिला. सोपी भाषा, बोलीभाषेतील शब्द आणि हळुवार भावनांचे चित्रण, ही त्यांच्या गीतांची वैशिष्टय़े. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, अशी नादमधुर गीते लिहिणारा’ हा कवी मराठी रसिकांचरणी आपली गीतसंपदा सादर करून दि. २१ डिसेंबर १९१७ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.