पावसाळ्यातही अमन लॉज ते माथेरानपर्यंत ‘टॉय ट्रेन’ चालवण्याचे गाजर प्रवाशांना यंदा दाखवले असले तरी मध्य रेल्वेच्या लेखी पावसाळा अजूनही सुरूच आहे
मुंबई – पावसाळ्यातही अमन लॉज ते माथेरानपर्यंत ‘टॉय ट्रेन’ चालवण्याचे गाजर प्रवाशांना यंदा दाखवले असले तरी मध्य रेल्वेच्या लेखी पावसाळा अजूनही सुरूच आहे. कारण ही गाडी सुरू करण्यासाठी आणखी १० ‘ट्रायल रन’चा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिका-याने दिली. या चाचण्या यशस्वी ठरल्या, तरच अमन लॉज ते माथेरानपर्यंत ही गाडी धावणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही ‘टॉय ट्रेन’ नेरळ ते माथेरान धावत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जाणा-या पर्यटकांचा हिरमोड होतो. पावसाळ्यातही ही गाडी चालवल्यास प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल हे लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. काही महिन्यांपूर्वी गाडीच्या चाचण्याही घेण्यात आल्या. त्याला जैन, बक्षी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
ही गाडी पावसाळ्यातही चालवण्यासाठी आयुक्तांनी तत्वत: मान्यता देताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही उपाययोजना करण्याच्या सूचनाही रेल्वेला दिल्या होत्या. रेल्वेने त्याची पूर्तता केली असली तरी ही ‘टॉय ट्रेन’ सुरू होण्याची चिन्हे अजून तरी नाहीत. कारण आणखी ‘ट्रायल रन’ घेण्याचा प्रस्ताव रेल्वेने सुरक्षा आयुक्तांना दिला असून आधी त्याला अनुमती, मग चाचण्या आणि त्यानंतर गाडी सुरू होण्याबाबात निर्णय असा प्रवास झाल्यानंतरच ही ‘टॉय ट्रेन’ धावू शकेल आणि त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, असे या अधिका-याने सांगितले.