कर्जत तालुक्यातील भातशेती पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धोक्यात आली आहे.
नेरळ- कर्जत तालुक्यातील भातशेती पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धोक्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने माळरानावरील भाताची रोपे सुकून चालली आहेत. आणखी काही दिवस पुरेसा पाऊस न झाल्यास शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. त्यातच भाताचे कमी होणारे क्षेत्र ही सुद्धा भात उत्पादनासाठी चिंतेची बाब आहे.
कर्जतमध्ये फार्महाऊसची संख्या वाढण्यापूर्वी २८ हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जात होती. मात्र, शेतक-यांनी वाढत्या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जमिनीचा तुकडा विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाताचे क्षेत्र कमी होत आहे. आज खरीप हंगामात होत असलेली भाताची शेती ही जेमतेम १० हजार हेक्टर एवढी खाली आली आहे.
शेतक-यांनी भाताचे बियाणे खरेदी करून ते शेतात टाकून पेरणी केली. भाताचे रोप शेतात टाकल्यानंतर खते आणि कीटकनाशके यांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे लावण्यासाठी ती तयार होणार नसल्याने पुन्हा भाताचे बियाणे खरेदी करावे लागणार या भितीने शेतकरी चिंतेत आहे. शेतीकामासाठी मजुरांची कमतरता, पावसाचा लहरीपणा यामुळे शेतक-याची चिंता वाढली आहे.