मुंबईकरांना दोन दिवसांपासून वेठीस धरणा-या पावसाने सोमवारी जरा विश्रांती घेतली.
मुंबई – मुंबईकरांना दोन दिवसांपासून वेठीस धरणा-या पावसाने सोमवारी जरा विश्रांती घेतली. सकाळी हलक्या सरींनी सुरुवात झालेल्या पावसाने दुपारी थोडा जोर धरला. परंतु, सायंकाळी तो ओसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
पश्चिम बंगाल येथे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरातहून राजस्थानच्या दिशेने सरकला आहे. यामुळे आता मुंबई किनारपट्टीवर दमदार पाऊस कोसळणार नाही. मात्र, सरीवर सरी कोसळतील, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपाध्यक्ष एन. वाय. पाटील यांनी सांगितले.
कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी सोमवारीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. रत्नागिरी येथे १२ मिलिमीटर तर वेंगुर्ल्यात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, कुलाबा येथे २१.५ तर सांताक्रूझ येथे १४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.