कर्जतचा रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी येथे पाली-भूतीवली धरण बांधण्यात आले. २००४ मध्ये धरणात पाणीसाठा झाला. तब्बल ३४ वर्षानंतर यावर्षीपासून धरणातील पाणी भातशेतीला देण्यात येणार होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी पाणी सोडण्यासाठी असलेल्या विहिरीचा दरवाजा बंद न केल्याने नोव्हेंबरमध्येच धरणात निम्माच पाणीसाठा शिल्लक आहे.
नेरळ – कर्जतचा रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी येथे पाली-भूतीवली धरण बांधण्यात आले. २००४ मध्ये धरणात पाणीसाठा झाला. तब्बल ३४ वर्षानंतर यावर्षीपासून धरणातील पाणी भातशेतीला देण्यात येणार होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी पाणी सोडण्यासाठी असलेल्या विहिरीचा दरवाजा बंद न केल्याने नोव्हेंबरमध्येच धरणात निम्माच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिका-यांनी विविध माहिती देत असल्याने वाहून गेलेल्या पाण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल येथील शेतकरी करत आहेत.
धरणात पाणीसाठा आहे पण कालवे नाहीत, अशी स्थिती वर्षभरापूर्वी पाली-भुतीवली धरणाची होती. धरण बांधून तब्बल ३४ वर्षानंतरही शेतीसाठी पाणी मिळत नाही. दरम्यान, येथील शेतकरी वर्गाचा वाढता दबाव पाहून गेल्यावर्षी धरणाच्या काही कालव्यांची कामे पूर्ण झाली. एकूण पंधरा किलोमीटरच्या कालव्यांमुळे एक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. २००४ पासून धरणात पाणीसाठा आहे. पण, कालव्यांचे काम रखडल्याने शेतीसाठी पाणी मिळत नव्हते. मधल्याकाळात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी धरणाची पाहणी करून कालवे आणि उर्वरित कामे करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. हा निधी मुंबई वरून मंजूर झाला, पण हा निधी ठाणे येथील विभागीय कार्यालयाकडून अन्य प्रकल्पांना वळविण्यात आल्याचे कर्जतपर्यंत पोहोचला नाही.
यावर्षी धरणाचे पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे, अशी भूमिका कर्जतकरांनी घेतली होती. त्यामुळे वर्षभरात पहिल्या टप्यात साडेसहा किलोमीटरचे कालवे तयार करून डिसेंबरमध्ये शेतीसाठी पाणी सोडण्याची तयारीही सुरू झाली. त्यासाठी धरणातील पाणी धरणाच्या मुख्य बांधातील विहिरीतून खाली कालव्यामध्ये सोडले जाणार होते. या विहिरीचे बांधकाम २००३ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, गेली १० वष्रे पाटबंधारे विभागाने या विहिरीत पाणी सोडले नव्हते. त्यातच ऑक्टोबरमध्ये पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी पाणी विहिरीतून सोडून दिले. मात्र विहिरीचा दरवाजा बंद केला नाही. त्यामुळे धरणातील पाणी वाहून गेले. पावसाळा संपला त्यावेळी धरणात ५० दशलक्ष घन मीटर पाणी होते. आता धरणात जेमतेम ५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.
पाटबंधारे विभागातील अधिका-यांनी मुद्दाम पाणी सोडून दिले आहे. या अधिका-यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.
– दिलीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते
धरणात पाणी शिल्लक नसल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. निधी देऊनही कालव्यांची कामे पूर्ण न झाल्याने जलसंपदामंत्री आणि आमदार यांना काय उत्तरे द्यायची असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना पडला आहे. त्यामुळे हताश झालेले अधिकारी दिवस-रात्र विहिरीचा दरवाजा बंद करण्यासाठी धडपड करत आहेत. पण, धरणासाठी शेती दिलेल्या शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.
– आत्माराम पवार, शेतकरी
धरणात भरपूर पाणीसाठा आहे. पण, मुख्य बांधामध्ये असलेल्या विहिरीचा दरवाजा बिघडल्याने शेतीसाठी पाणी सोडण्यात आले नाही. – पी. ए. बो-हाडे, शाखा अभियंता
विहिरीतील पाणी वाहून गेले आहे. यासंदर्भात साता-यातून तज्ज्ञांची टीम आली आहे. उपाययोजना सुरू आहेत, पण, यावर्षी शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नाही.
– सी. के. शिंदे, उप अभियंता