कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरणाच्या पाण्याची पातळी खालावली असून, धरणात केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
नेरळ – कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरणाच्या पाण्याची पातळी खालावली असून, धरणात केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. वरुणराजाची रिमझिम सुरू असली तरी धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात लघु पाटबंधारे खात्याच्या कंत्राटदारांचा मनमानी कारभार सुरू असल्याने धरणाच्या दरवाजाचे काम निकृष्ट झाले आहे. परिणामी धरणातील शिल्लक साठाही नाल्यांतून वाहत आहे. पावसाअभावी ध्ररण भरत नसल्याने शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे.
पाली-भुतिवली धरणाचे काम १९८३-८४ साली सुरू झाले होते. या योजनेसाठी ३८.५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २००३ मध्ये मुख्य जलाशयात पाणीसाठा झाला. २००४च्या हंगामात शेतीसाठी पाणी मिळाले नाही. त्या वेळी सिंचनासाठी आवश्यक १५ किमीच्या कालव्यापैकी ४-५ किमीच्या कालव्यांची कामे पूर्ण झाली नव्हती. २००९मध्ये मुख्य बांधाची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर धरणाच्या मोठया प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. मास्तर कंपनीने धरणाचे काम हाती घेतले होते, मात्र या कंपनीचे काही कोटी रुपयांचे देयक थकल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवली. उत्खननावरून कर्जत तहसील कार्यालयाने कारवाई केल्यानंतर वर्षभर काम बंद राहिले. निधी नाही म्हणून देयक थकत असल्याने कामे पूर्णपणे बंद झाली. या बंदावस्थेत पडलेल्या कामांबाबत कोणतीही पाऊले उचलली जात नसल्याने शेतकरी नाराज आहे.
२०१२ मध्ये पाली-भुतीवली धरण १९ कोटी रुपयांच्या निधीअभावी रखडले आहे, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. त्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे धाबे दणाणले होते. पाली-भुतीवली धरणाच्या वसाहतीलाही अवकळा आल्याने कंत्राटदारांनी निधीचा गरउपयोग केल्याची चर्चा शेतकरीवर्गात सुरू होती. निधीअभावी धरणाचे काम, डाव्या व उजव्या कालव्यांची बांधकामे, धरणात खालावलेली पाण्याची पातळी व धरणाच्या वसाहतीला आलेली अवकळा या गंभीर समस्यांमुळे शेतकरी शेतीला पाणी मिळणार कधी म्हणून चिंतातूर झाला आहे.
या वर्षी पावसाची रिमझिमच सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठयात घट होत आहे. शेतक-यांच्या नुकसानभरपाईसाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा. – विठ्ठल ठोंबरे, शेतकरी, कर्जत