अनेक वर्षे रखडलेल्या कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरणाच्या उर्वरित कामांना सुरुवात झाली आहे
नेरळ – अनेक वर्षे रखडलेल्या कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरणाच्या उर्वरित कामांना सुरुवात झाली आहे. धरणाच्या सांडव्याचे रखडलेले काम आणि पहिल्या टप्प्यातील कालव्याची कामेही सुरू झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी साडेतीन कोटींची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम ५० कोटींवर जाऊनही धरणाचे पाणी शेतात पोहोचलेले नाही.
पाली-भुतिवली लघु पाटबंधारे प्रकल्पाला सुरुवात होऊन आज ३५ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे धरणाच्या कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम वाढत गेली आहे. धरणात पाणी अडवले गेल्याला १० पावसाळे उलटले. तरीदेखील पाण्याचा एक थेंबही शेतात पोहोचलेला नाही. त्यामुळे धरण शेतीसाठी की केवळ पाणी अडवून ठेवण्यासाठी हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
धरणात पाणी अडवल्यानंतर हे पाणी एकूण ओलिताखाली येणा-या क्षेत्रापैकी ३५ टक्के जमिनीला देणे बंधनकारक असते, मात्र गेली १० वर्षे पाटबंधारे विभागाने हे पाणी शेतीसाठी सोडलेले नाही. धरणाखाली पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेले पहिल्या टप्प्यातील कालवे पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाची सध्या धडपड सुरू आहे. एकूण १५ किलोमीटर कालव्यांपैकी साडेसहा किलोमीटर कालवे पूर्ण करत असताना अनेक ठिकाणी जमिनीचे संपादन झालेले नाही. तेथे कालवा पूर्ण करण्यासाठी मोठय़ा संख्येने पाइप आणण्यात आले आहेत. मात्र हे करत असताना कालव्यात व्यवस्थित पाणी वाहून जाते की नाही, हे तपासण्यासाठी धरणात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे कालवे पूर्ण झाले तरी शेतक-यांच्या शेतात किमान या वर्षी तरी पाणी पोहोचणार नाही. कालव्यांच्या कामाबरोबर धरणाच्या मुख्य बांधाला असलेला सांडावा बांधूनही झाला नव्हता. हा सांडावा पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराचीही धावपळ सुरू आहे. त्यामुळे या वर्षी तरी मुख्य धरणाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे.