चंदनवाडी-नितीन कंपनी रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले कचराळी तलाव येथील ठाणे महापालिकेच्या मालकीचे गौरशंकर सिद्धिविनायक मंदिर पाच वर्षाच्या कालावधीसाठी बाळगोपाळ मित्र मंडळाला वापरण्यास देण्यात येणार आहे.
ठाणे- चंदनवाडी-नितीन कंपनी रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले कचराळी तलाव येथील ठाणे महापालिकेच्या मालकीचे गौरशंकर सिद्धिविनायक मंदिर पाच वर्षाच्या कालावधीसाठी बाळगोपाळ मित्र मंडळाला वापरण्यास देण्यात येणार आहे.
१९९७मध्ये रस्ता रुंदीकरणात हे मंदिर बाधित झाले होते. पर्यायी जागा म्हणून अंतिम भूखंड क्रमांक ३५३ कचराळी तलाव उद्यानात मंदिरास देण्यात आली होती. पालिकेने खर्च करून बांधलेल्या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम बाळ गोपाळ मित्र मंडळाला देण्यात आले होते. मात्र मंदिराचा ताबा मंडळाकडे देण्यात आला नव्हता. हे मंडळ मंदिराची देखभाल, दुरुस्ती, पुजा-याचा पगार, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल स्वत: भरत आहे. म्हणून मंदिराचा ताबा मंडळाला द्यावा, अशी शिफारस स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. यापूर्वी महापालिकेने ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील पालिका उद्यानातील गणेश मंदिर श्री गणेश उद्यान मंदिर ट्रस्टला २००६मध्ये वापरायला दिले आहे. असा दाखला देत कचराळी तलाव उद्यानातील गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर बाळगोपाळ मित्र मंडळास अटी व शर्तीवर पाच वर्षाच्या मुदतीसाठी वापरण्यास देण्यास प्रशासन तयार झाले आहे.