वसई-विरार महानगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे भोईदापाडा येथील बेकायदा डम्पिंग ग्राऊंडमुळे समोर आले आहे.
विरार – वसई-विरार महानगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे भोईदापाडा येथील बेकायदा डम्पिंग ग्राऊंडमुळे समोर आले आहे. ‘प्रहार’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर याबाबत आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाबाबत नियम डावलले गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शहरातून निघणा-या कच-यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने २००० साली घनकचरा व्यवस्थापन नियम अमलात आणला. त्यानुसार देशातील सर्वच महापालिकांना त्याचे कठोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र, वसई-विरार महानगरपालिकेने या कायद्याला पायदळी तुडवले आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे ती जागाच नियमात बसत नाही. पालिकेने त्यासाठी वसई-भोईदापाडा येथील सर्वे क्रमांक ‘३० अ’, ३१, ३२ ही खदानीची जागा महापालिकेला देण्यात आली आहे. ही जागा संजय गांधी राष्ट्रीय अभायरण्याचा भाग असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्याला लागूनच आहे. त्यामुळे असे प्रकल्प वनजमीन किंवा अभयारण्याजवळ नसावेत असा घनकचरा व्यवस्थापनाचा नियम आहे, तो डावलला जात आहे. हा प्रकल्प इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्याच्या कुशीतच टाकला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे लगतच्या निसर्गसंपदेला धोका आहे.
घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार १६ अटी आणि मार्गदर्शक नियमावलीनुसार कच-याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावायची असते. तसेच कचरा उचलणे, वाहतुकीबाबतही कडक नियम आहेत. कच-याचा पुनर्वापर करण्यासाठी कच-याची छाननी करून तसा कचरा बाजूला काढून त्यावर प्रक्रिया करण्याचा नियम आहे. कच-यापासून पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून असलेली ही नियमावली वसई-विरार महापालिकेकडून पायदळी तुडवली जात आहे.
पालिका क्षेत्रातून दररोज ७०० टन कचरा गोळा होतो आणि हा घनकचरा नऊ एकर जागेत टाकला जात आहे. या परिसरात तीन वर्षापासून कच-याची दरुगधी पसरत आहे. त्यामुळे लाखो टन कचरा गोळा झाला असून २०० फूट उंच कच-याचे डोंगर तयार झाले आहेत. तर ३५ फूट जमिनीच्या खोलीपर्यंत कचरा पुरला गेला आहे. या कच-याला आग लागल्यामुळे प्रदुषणाचा प्रश्नही निर्माण होत आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळानेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड अभ्ययारण्याला लागून आहे. या ठिकाणी जो प्रकार सुरू आहे, त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई केली जाईल. – के. अहिरे, वन अधिकारी, संजय गांधी नॅशनल पार्क