गेल्या काही दशकात राज्यातील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या गुन्हय़ांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे.
गेल्या काही दशकात राज्यातील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या गुन्हय़ांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे. दारू, मटका, जुगार फोफावलेला असतानाच गेल्या काही दिवसात खून, मारामा-या याचबरोबरच मुलींची व महिलांची छेडछाड असे प्रकारही वाढीस लागल्याने जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाभरात सुरू असलेल्या चोरी व घरफोडय़ांची मालिका पाहता पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वासच राहिला नाही. पालकमंत्र्यांचा अंकुश न राहिल्याचेच यातून सिद्ध होत आहे. या सर्व प्रकारांनी जिल्हयातील जनता भयभीत झाली असून हेच का अच्छे दिन असा सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांचे होमपिच असलेल्या सावंतवाडीतही सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
गेल्या काही महिन्यांत सावंतवाडी शहराबरोबरच ग्रामीण भागात चोरी व घरफोडय़ांचे प्रमाण फारच वाढले आहे. सुसंस्कृत शहर ही ओळख असलेले हे शहर सध्या जुगार व मटक्याचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे यात सत्ताधारी सेनेतील कार्यकर्तेच आघाडीवर आहेत.
पालकमंत्र्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा तसेच काही नगरसेवक पुत्रांचा यात समावेश दिसून आला आहे. दोन दिवसांपूर्वी चौकुळ येथे जिल्हा पोलिसांनी जुगारावर टाकलेल्या धाडीत सेना नगरसेविकेचा पुत्र असलेल्या एका सेना कार्यकर्त्यांला व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.
पालकमंत्र्यांच्या निवासालगतही कार्यकर्त्यांकडून मटका स्वीकारला जातो. या सर्वाशी पालकमंत्र्यांचे सहकारी संबंधित असल्यानेच पालकमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे जाहीरपणे बोलले जात आहे.
कथित दहशतवादाचे स्तोम माजवून सत्तेवर आलेल्या पालकमंत्री केसरकरांना जिल्हयाचे पालकत्व स्वीकारून सात महिन्यांचा कालावधी उलटला. या कालावधीत शांत, संयमी म्हणून ओळखल्या जाणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था पुरती कोलमडली आहे. चोरी व घरफोडय़ांनी अर्धशतक गाठले आहे. शांत व संयमी सावंतवाडी शहरातही गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
चोरी, घरफोडया वाढत असतानाच शहरातील काही महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे दारूच्या पाटर्य़ाही झडू लागल्या आहेत. शहरातील भाजीमार्केट, मच्छीमार्केट, विकास संकुले, शासकीय कार्यालये एवढेच नव्हे तर रुग्णालयानजीकही मटका व जुगाराची केंद्रे खुलेआमपणे सुरू आहेत.
रुग्णालयाच्या लगत तर धूम्रपानाचा अड्डाही राजरोसपणे सुरू आहे. एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणा-या सावंतवाडी शहरात सध्या महाविद्यालयीन मुलींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढीस लागले आहेत.
केसरकर समर्थक युवा कार्यकर्त्यांकडूनच एका दुकानातील सेल्सगर्लची छेडछाड केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. हा प्रकार नंतर पोलीस ठाण्यात राजकीय दबावापोटी मिटविण्यात आला होता. त्यानंतर दोनच दिवसात केसरकर समर्थक महिला लोकप्रतिनिधीच्या मुलाकडून शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महाविद्यालयीन युवतीची छेड काढण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी चौकुळ-नेनेवाडी येथे जुगार अड्डयावर टाकलेल्या धाडीत सेना नगरसेविकेच्या पुत्राला व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.
काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी शहरात झालेल्या वासनाकांडात अटकेत असलेल्या युवकांमध्येही एका नगरसेवकाच्या पुत्राचा समावेश होता. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच हे प्रकार राजरोसपणे घडत असल्याने हा दहशतवाद कुणाचा असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कथित दहशतवादाचा डंका पिटणा-या केसरकरांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरही अंकुश नसल्याचेच यातून सिद्ध झाले आहे.
सावंतवाडी शहरात मटका, जुगाराबरोबरच व्हीडिओ पार्लरच्या नावाखाली ऑनलाईन कसिनोंचे जाळे पसरले आहे. विशेष म्हणजे यातही पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते आघाडीवर आहेत. ग्रामीण भागातही जुगारांचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. जुगार, मटका यावर पैसा लावण्यासाठी पैशांची कमतरता भासल्याने धाडसी चो-यांचे प्रमाणही वाढले आहे. यातूनच वाढत्या गुन्हेगारीतून मारामा-या व खुनांपर्यंत युवकांची मजल गेली आहे.
सुसंस्कृत सावंतवाडी शहराचे भविष्य असलेली युवा पिढीच यातून वाममार्गाला लागली आहे. शहरात धूमस्टाईल बाईक चालविणे हे तर रोजचेच झाले आहे. एकीकडे दहशतवादाच्या विरोधात आवई उठविणा-या केसरकरांचेच फलक लावणारे कार्यकर्ते आरोपी असल्याचे उघड आहे.
राजकीय राडा, दहशतवाद यावर जाहीर वक्तव्य क रणारे पालकमंत्री केसरकर त्यांच्याच शहरात व जिल्हयातही वाढलेला हा सामाजिक दहशतवाद थोपवू शकत नसतील तर त्यांनी पालकमंत्रीपदावर राहणे कितपत योग्य ठरेल, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्हयातील वाढत्या चो-यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आता जिल्हयातील काही विशेष भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली आहे. मात्र, चोरी व घरफोडय़ांसारख्या प्रकारात हे सीसीटीव्ही कॅमेरे कितपत न्याय देतील हाच सवाल आहे. त्यातकरूनही पदावर आल्यापासून आश्वासनांचा पाऊस पाडणा-या पालकमंत्र्यांनी आपण काहीतरी मोठे दिवे लावत आहे अशा रितीने याबाबत जाहीरपणे डंका पिटला आहे.
यातून चोरटेच सावध होणार आहेत. कालच झालेल्या एका चोरीच्या प्रकारात चोरटय़ांनी सीसीटीव्ही कॅमे-याची दिशाच फिरविली होती. कॅमे-याचा अंदाज आल्यास कॅमे-याचे प्रक्षेपण बंद करणेही फारसे कठीण नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळेही चोरींच्या प्रकारांना फारसा आळा बसणे कठीणच आहे.
एकंदरीत जिल्हयातील वाढलेल्या या गुन्हेगारीचा विचार करता या सर्वाला पोलीस प्रशासनाची नव्हे तर पालकमंत्र्यांचीच अकार्यक्षमता जबाबदार असल्याचे उघड होत आहे. पोलीस यंत्रणेवर अंकुश ठेवण्याइतपत पालकमंत्र्यांचा दराराच राहिला नाही. त्यामुळेच गुन्हेगारीचे स्तोम वाढत आहे.
त्यातही त्यांचेच कार्यकर्ते यात आघाडीवर असतील तर ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशीच काहीशी अवस्था सध्या कायदा-सुव्यवस्थेबाबत झाली आहे. नारायणराव राणे पालकमंत्री असताना या जिल्हयाचा क्राईम रेशो राज्यातील इतर जिल्हय़ांच्या तुलनेत सर्वात खाली होता. मात्र, अलीकडील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाही गुन्हेगारीचे केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही.