पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही पाणी योजना रद्द करण्याचा धक्कादायक प्रस्ताव दिला असून यामुळे देवगड-जामसंडेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
देवगड- देवगड-जामसंडे गावांसाठी ३५ कोटी खर्च करून नवीन पाणी योजना प्रस्तावित आहे. ही पाणी योजना केवळ नगर पंचायतीच्या अटीमुळे अडलेली असताना ती अडचण दूर न करता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही पाणी योजना रद्द करण्याचा धक्कादायक प्रस्ताव दिला असून यामुळे देवगड-जामसंडेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
देवगड-जामसंडे या गावाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहेत. आमदार नितेश राणे यांनी यासाठी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पालकमंत्री केसरकर यांची भूमिका या सर्व प्रयत्नांना बॅकफुटवर नेणारी आहे.
गुरुवारी पंचायत समितीतील बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी अजब प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानुसार देवगड प्रादेशिक नळ योजनेवर ११ गावं पाणी पितात या गावांना सध्या हे पाणी पुरत नाही. यामुळे या योजनेतील ९ गावांसाठी नवीन योजना करावी व केवळ देवगड-जामसंडे गावासाठी जुनी योजना दुरुस्त करून वापरावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. यावरून पालकमंत्र्यांना या योजनेबाबत काहीच माहिती नाही असे दिसून आले.
ही योजना ४० वर्षाची जुनी असून उद्भवाची विहीर सर्व पाईपलाईन, पंप हे कालबाह्य व दुरुस्तीपलीकडे गेले आहेत. शिरगाव येथील पाणी उद्भवाचे इनटेक चेंबर गेले काही दिवस नादुरुस्त आहे. त्यावरील पंप जुने असून ते कालबाहय़ व कमी अश्वशक्तीचे आहेत. हे पंप बदलून जर जास्त अश्वशक्तीचे पंप बसवले तर शिरगाव ते देवगड पाईपलाईन त्या क्षमतेची नाही. यामुळे ही पाईपलाईन जास्त व्यासाची बसवावी लागेल.
दहीबाव हा योजनेचा दुसरा उद्भव असून या पाणी योजनेची अवस्था गंभीर आहे. ही सर्व १३ कि.मी. पाईपलाईन बदलण्याची गरज असून नवीन पंप बसवणे गरजेचे आहे. एवढी योजना दुरुस्त करायची असेल तर या योजनेला सुमारे १२ कोटींची गरज आहे. यापेक्षा नवीन योजना करणे गरजेचे आहे. ९ गावांसाठी योजना निर्माण करायची असेल तर पुढील दोन वर्षे ही योजना आकारता येणार नाही. याचा सर्व देवगड-जामसंडेचा पाणी प्रश्न पुढील दोन वर्षे सुटणार नाही.
दहीबावमधील लोकांचा या योजनेला विरोध असून यापुढे दहीबाव येथून पाणी योजना उचलण्याला विरोध आहे. यामुळे त्यांचा असंतोष तीव्र स्वरूप धारण करू शकतो. नव्या योजनेमध्ये रोज पाणी देण्याची योजना आहे. पालकमंत्र्यांची नव्या योजनेबाबत भूमिका पाहता देवगड व जामसंडेची पाणी योजनेतून केवळ एक दिवस आड पाणी नशिबी आले आहे.