विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजले. विविध मुद्दयांवर विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज अनेकदा बंद झाले. कधी ओला दुष्काळ जाहीर करावा तर कधी आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजले. विविध मुद्दयांवर विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज अनेकदा बंद झाले. कधी ओला दुष्काळ जाहीर करावा तर कधी आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांसमोरील बरेचसे कामकाज तुंबून राहिले आहे. दोन दिवस उरले असताना विरोधक व सत्ताधा-यांना कामकाज उरकण्याची घाई झाल्याचे गुरुवारी जाणवले. विधानसभा व विधान परिषद दोन्ही सभागृहांत कमकाज पत्रिकेवर कार्यक्रमांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. जणू दोन्ही बाजूने आवराआवरीची तयारी सुरू होती.
विधान परिषदेत तर कामांची अक्षरश: गर्दी झाली होती. दोन्ही सभागृहांचे काम नेहमीपेक्षा लवकर ठेवण्यात आले. विधानसभेची विशेष बैठक सकाळी ९.२५ वाजता बोलावण्यात आली होती. तर विधान परिषदेची विशेष बैठक साडेदहा वाजता ठेवण्यात आली होती. दोन्ही सभागृहांत आग्रहाने मागणी केल्याप्रमाणे विदर्भातील अतिवृष्टीवर बुधवारी दोन्ही सभागृहांत चर्चा झाली होती. त्याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी विविधमंडळाच्या सभागृहात दिली. सिंचनावरील चर्चा होण्यासाठी विधान परिषदेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत झाले होती. ती चर्चा अखेर सभागृहात उपस्थितीत झाली. मात्र पहिल्यांदा दिलेला प्रस्ताव पानभर होता. त्यातील अनेक मुद्दे गाळून तो चर्चेसाठी आला. या प्रस्तावाचे आकारमान कमी झाल्याचे आपल्याला कळालेच नाही, असे शिवसेनेचे रामदास कदम म्हणाले.
तसेच विधान परिषदेत ११ लक्षवेधी सूचना कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आल्या होत्या. या अधिवेशनातील हा उच्चांक होता. तसेच अर्धा तासाच्या १२ चर्चा कार्यक्रमपत्रिकेत दाखवण्यात आल्या होत्या. विधानसभेची कामकाजपत्रिका जणू पुस्तिकाच होती. १९ पानांच्या कार्यक्रमपत्रिकेत १३ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या होत्या. तर अध्र्या तासाच्या १९ चर्चा दाखवण्यात आल्या होत्या. विरोधकांच्या हक्काचे आयुध असणारा अंतिम आठवडा प्रस्तावही दिला होताच. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्ताव राज्यातील कायदा व सुवस्थेवर देण्यात आला होता.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या प्रस्तावावरील चर्चा सुरू केली. बऱ्याच दिवसांनंतर खडसे यांना भाषणाचा चांगला सूर सापडला होता. गृहविभागाला अधूनमधून डागण्या देत असताना कधी कधी त्यांनी उपहासात्मक वक्तव्य करत गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अनेकदा टोपी उडवली. गृहमंत्र्यांच्या घोषणाबाजीची फिरकी घेताना खडसे म्हणाले, ‘आर. आर. आबा म्हणतात, आमच्या राज्यात एवढी सुरक्षितता आहे की काठीला सोने बांधून फिरले तरी कुणाला कोणताही धोका पोहचणार नाही.
आबा तुमच्या राज्यात सोने तर पाहायला मिळत नाहीच. पण काठी तरी कुठे राहिली आहे. आहो तुम्ही पोलिसांकडील काठीही काढून घेतली. आबा आता पोलिसांकडे लाकडाच्या पूर्वी होत्या तशा लांबलचक कणखर काटय़ा नाहीत. आता फोल्डिंगच्या प्लास्टिक काठय़ा आल्या आहेत. त्याही दीडफूट लांबीच्या. कुठे आहेत त्याच दिसत नाहीत. अरे पूर्वी लांबलचक दणकट काठी घेऊन पोलिस बंदोबस्तासाठी उभा राहायचा तेव्हा त्याचा लोकांना धाक वाटायचा. आता काठीच नाही तर धाक कुठला उरेल? पोलिसांचा धाकच न उरल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे, असा टोलाही खडसे यांनी लगावला.
गृह विभागाने घातलेल्या वेगवेळय़ा बंदीचीही खडसे यांनी फिरकी ताणली. ते म्हणाले, डान्सबार बंद! केली घोषणा.. उठवली कोर्टाने.. पुन्हा गुटखा बंद.. तीही बंदी एकदा कोर्टाने उठवली होती. आता पुन्हा लागू केली. आता काय तर मावा ल खर्रा बंद.. काही तरी चालू ठेवा. विदर्भातील एका खर्राप्रेमीने मला विचारले. खर्रा का बंद केला? मी म्हणालो, तंबाखूने अपाय होतो म्हणून केला. तर तो म्हणाला, आबा इतके दिवस खात होते त्यांना कुठे काय झाले? पानावर बंदी.. आबा पानावर बंदी नका घालू.. अहो विदर्भात पान खाणे म्हणजे मजा असते. तुम्ही या एकदा.. पान खाए सय्याँ हमारो.. ऐकलंय ना? जरा तरी रसिकता ठेवा. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला व खडसे यांनी त्यांचे भाषण आवरते घेतले.