कम्युनिस्ट नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील हल्ला आहे.
पुणे – कम्युनिस्ट नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील हल्ला असून, पानसरेंच्या मारेक-यांना पकडण्यात कुठलीही कसूर ठेवणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमवारी अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले.
पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट असून, पानसरेंच्या मारेक-यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आहे.
हा राज्याच्या पुरोगामी परंपरेवरील हल्ला असून, अशा प्रवृत्ती सहन करणार नाही. राज्यात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी पोलिसांचा बचाव केला. चौकशी करणा-या तपास पथकांना जबाबदार धरणे अयोग्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. संशयित मारेक-यांची रेखाचित्रे तयार केली असून, पोलिस लवकरच मारेक-यांपर्यंत पोहोचतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.