उजनी धरणातील उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत करणा-या सोलापुरातील शेतक-यांनी बुधवारी चक्क मुंडण करून निषेध व्यक्त केला.
मुंबई – उजनी धरणातील उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत करणा-या सोलापुरातील शेतक-यांनी बुधवारी चक्क मुंडण करून निषेध व्यक्त केला. आंदोलनाला बुधवारी १०० दिवस पूर्ण झाले, तरीही सरकारने आपल्या मागणीकडे कानाडोळा केल्याने आपण मुंडण करत आहोत, असे सोलापूर जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
आंदोलनाचे शंभर दिवस असल्याने सरकारचा निषेध करण्याचा हा आमचा अनोखा मार्ग असून, निदान सरकारने आतातरी पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या सोलापूरच्या जनतेची तहान भागवावी, अशी विनंती देशमुख यांनी यावेळी केली.
न्यायालयाकडूनही आदेश आला. मात्र, धरणात सोलापूरकरांसाठी पाणी नाही. सरकारने आंदोलनाचा मार्ग अधिक तीव्र करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
गेल्या शंभर दिवसांत अनेकदा सरकारपुढे मागण्यांचा प्रस्ताव ठेवला. लाठीचारही सहन केला. तरीही मागणी अद्याप प्रलंबित आहे. उजनीत पाणी सोडण्याचा विचार नसेल तर राज्यकर्त्यांनी यापुढे सोलापुरात येण्याचा विचार करू नये, असा इशाराही देशमुख यांनी दिला.