राज्याच्या विविध भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना मराठवाडा अजून कोरडाच आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/02/water-tankers.jpg)
मुंबई- राज्याच्या विविध भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना मराठवाडा अजून कोरडाच आहे. त्यामुळे येथील जनता पाण्यासाठी तडफडत आहे. त्यातही ८५४ गावांत पिण्याच्या पाण्याची मोठी बोंब असून सरकारमार्फत केवळ १२९ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत टँकर्स लागलेल्या गावांची संख्या वाढली आहे. येत्या महिन्याभरात येथे पाऊस न पडल्यास येथील परिस्थिती आणखी भयानक होणार आहे. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यावरही १ हजार ३२२ गावांमधील २ हजार २४५ वाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे. यापैकी सर्वात जास्त मराठवाडा आणि नगर विभागात पाण्याची खूपच वणवण आहे.
सध्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यामधील ३५८ गावे आणि १ हजार ३८६ गावांना टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. तर दुसरीकडे मराठवाडा कोरडा असल्याने येथील बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यासह ८५४ गावांत आजही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. या दुष्काळी परिस्थितीत सरकारमार्फत केवळ १२९ टँकर्स आणि ४४४ खासगी टँकर्स मिळून एकूण ११४९ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी टँकर्स लावलेल्या गावांची संख्या १ हजार ३२९ होती. यंदा ती वाढली आहे.
ऐन पावसाळयात बीडकर आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवित आहेत. बीड शहरात सध्या नगर पालिकेकडून आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. दोन ते तीनच दिवसात पालिकेचे आलेले पाणी संपत असल्याने राहिलेले आठ दिवस काढायचे कसे? असा प्रश्न प्रत्येकापुढे असतो.
शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील िबदुसरा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. तर माजलगाव धरणातुन माजलगाव, बीड शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरीकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे तलाव आणि धरणेही पूर्णपणे भरलेली नाहीत. यंदाही मराठवाड्यातील बहुतेक गावांत आणि शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शहरी भागात चार दिवसातून एकदा पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी सोडले जाते.
शेकडो खेडयांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या कूपनलिकाही पाण्याचे पुनर्भरण झाले नसल्याने कोरडया पडल्या आहेत. गेली काही वर्षे मराठवाडा दुष्काळाच्याच छायेत असून यंदाही तीच भीषण परिस्थिती जाणवत आहे.
मराठवाडयातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड पट्टयातील मुखेड-किनवट या पट्टयांबरोबरच परभणी, जालना, औरंगाबादच्या ग्रामीण भागात शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली नाही तर औरंगाबाद शहरालाही पाणीपुरवठा करणे काही दिवसांनी शक्य होणार नाही. पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणात स्थलांतर होऊ शकते.
पिकांची अवस्थाही अतिशय वाईट आहे. खरीपची सर्व पिके मराठवाडयात पार गेली आहेत. मराठवाडयाच्या उस्मानाबाद, लातूर, बीड भागात मूग, उडीद, सोयाबिन ही पिके महत्त्वाची असतात. मात्र, यंदा पाऊसच नसल्यामुळे पेरण्याच फारशा झालेल्या नाहीत. बीडचा काही भाग, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात कापसाची अवस्था पाण्याअभावी फारच वाईट आहे.