राज्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे ६० हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे
बारामती – राज्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे ६० हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमवेत नुकतीच बैठक झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती येथे आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील पाणी योजनांबाबत दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीला आपण आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. बैठकीत राज्यातर्फे ६० हजार कोटी रुपयांचा ३ वर्षाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित योजना पूर्ण करण्यात येतील.
राज्यातील काही भागांत आजही पावसाची प्रतीक्षा आहे. धरणे, विहिरी, तलावांमधील पाण्याची पाणीपातळी वाढवण्यासाठी शिरपूर पॅटर्न, सिमेंट बंधा-यासारखे उपक्रम वर्षभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी पाणी असणा-या ठिकाणी रॉयल्टी न घेता तलाव, धरणातील गाळ नेण्याची परवानगी देण्याचे धोरण राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पावसाळी अधिवेशनात परवानगी घेण्यात येईल.
पाणीटंचाई टाळण्यासाठी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार आहे. येत्या ५ वर्षात सहकार विभाग आणि साखर कारखाने यांच्या सहभागातून उपाययोजना करण्यात येणार आहे. या अंतर्गत पाण्याचा काटकसरीने वापर करून ठिबक सिंचन राबवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने निरा नदीत पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने बारामतीत राबवण्यात येत असलेला करिअर अॅकॅडमी पॅटर्न राज्यात राबवला जाणार आहे.
राष्ट्रवादी देणार तरुणांना संधी
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीत असले तरी नेहमी परिसरातील घडामोडींविषयी माहिती घेतात. राज्यातील पाऊस, साखरेचे दर, साखर कारखान्यांचे नियोजन आदींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. ७३ व्या वर्षी लोकसभा निवडणूक न लढवण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी किमान राज्यसभेवर तरी जावे, अशी पक्ष संघटनेची मागणी आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने लोकसभेत असणे देशाच्या, समाजाच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याचे काम राष्ट्रवादी करणार आहे. राष्ट्रवादीच्या २२ तसेच काँग्रेसच्या २६ जागा असणार आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.