‘भारतमाता की जय’ म्हणणे हा माझा अधिकार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले तरी मी ते सोडण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठया स्वाभिमानाने म्हणाले होते.
मुंबई- ‘भारतमाता की जय’ म्हणणे हा माझा अधिकार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले तरी मी ते सोडण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठया स्वाभिमानाने म्हणाले होते.
तोच स्वाभिमान दाखवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देऊ शकलो नाही, तर मुख्यमंत्रीपद सोडेल असे ते म्हणतील काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभेत केला.
मराठवाडयातील दुष्काळावर नियम २९३ अन्वये विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना विरोधी सदस्यांसह सत्ताधारी सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मराठवाडयात चा-याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या रोज कानावर येऊन थडकत आहेत.
अनेक शेतक-यांच्या मुलींची लग्ने पाण्यावाचून आणि पीक न आल्याने होऊ शकलेली नाहीत. झाडावरून माणूस पडला तर पाच लाख रुपये दिले जातात. मात्र आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाख रुपये मिळतात. तेही पाच लाख करावे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.
लातूर येथे पाण्याचा टँकरसाठी झालेली गर्दी आवरण्यासाठी १४४ कलम लागू करावे लागले. हीच परिस्थिती अशीच राहिल्यास मराठवाडयातील प्रत्येक गावात १४४ कलम लागू करावे लागेल, अशी भीती ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
तर राष्ट्रवादीचे विजय भांबळे म्हणाले की, मराठवाडयातील लोक स्थलांतरित होत आहेत. ही परिस्थिती गंभीर असून सरकारने उपाययोजना केली नाही, तर शेतकरी मंत्रालयावर येऊन धडकल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही भांबळे यांनी दिला.