लातूर स्टेशनवर पाणी एक्स्प्रेस पोहोचली. ‘चहापेक्षा किटली गरम’, तशी या पाणी एक्स्प्रेसची जाहिरात झाली. वारणेचे पाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात आणले गेले. तीन दिवस जाहिरात चालू होती.
लातूरला २४ वॅगन पाणी घेऊन येणारी ती पाणी एक्स्प्रेस वाहिन्यांनी तीन दिवस इतक्या वेळा दाखवली की, तेवढय़ा वेळात ती देशात कुठेही पोहोचली असती. संपूर्ण मराठवाडय़ाची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्याचे गांभीर्य न सांगता धावणारी पाणी एक्स्प्रेस हा आकर्षणाचा विषय ठरवला गेला. पाणी किती तर ५ लक्ष ५० हजार लिटर. लातूरची लोकसंख्या किती तर २० लाख. महानगरपालिका झाली आहे आता. २० लाख लोकांना ५ लक्ष ५० हजार लिटर पाणी म्हणजे एकाच्या वाटय़ाला आले ३ लिटर. तेवढेसुद्धा येणार नाही. कारण वॅगनमधील पाणी कृत्रिम विहिरीत ओतून वाटप होईपर्यंत पाच-दहा हजार लिटर पाणी वायाच जाणार. तेव्हा एका माणसाला तीन लिटर पाणी देण्याकरिता जी पाणी एक्स्प्रेस आली त्याची जाहिरात जास्त झाली आणि पाणी कमी आले. लातूरला पाणी मिळाले याचा आनंद आहे. विलासरावांनी मोठय़ा हिंमतीने मांजरा धरण उभे केले होते. त्यांचा सहकारी साखर कारखाना, त्याला मांजरा नदीचेच नाव त्यांनी दिले. ती मांजरा नदी पूर्ण सुकली. नदी सुकली म्हणून धरण सुकले. धरण सुकले म्हणून शहराचा पाणीपुरवठा आज बंद झाला. सुरुवातीला पाणी उजनीतून उचलायचे ठरले होते. पण ते पाणी आता सोलापूरची तहान भागवत आहे. त्या धरणाच्या क्षमतेपेक्षा १४ टक्केच साठा शिल्लक आहे. उजनी आणि कोयना या ?दोन्ही धरणाची स्थिती सारखीच आहे. दुसरे मोठे धरण जायकवाडी. या धरणातील साठय़ानेही तळ गाठलेला आहे. यवतमाळचे अरुणावती धरण आणि नांदेडचे विष्णुपुरी या धरणातील पाणी पंपाने खेचायला सुरुवात केली तर चिखल येऊ लागला आहे. संपूर्ण मराठवाडय़ातील एकाही धरणात पाणी नाही आणि नदीतही पाणी नाही. वरून प्रचंड ऊन. सूर्य आग ओकतोय. पाण्याकरिता माणसे गाडगी, मडकी घेऊन धावत आहेत. जनावरांची ससेहोलपट सुरू आहे. माणसाला खायला धान्य आहे, पण धान्य शिजवायला पाणी नाही. आणि प्यायला पाणी नाही. जनावरांची स्थिती एवढी बिकट की त्यांना चाराही नाही आणि पाणीही नाही. पूर्वी कुणीतरी म्हटलं की, ‘मुकी बिचारी कुणीही हाका..’ आता हाकावी लागत नाहीत. वाट फुटेल तिकडे चारा आणि पाण्याच्या शोधात पशुधन अस्ताव्यस्त फिरत आहे. कडब्याची पेंडी ६०० रुपयांच्या पुढे गेली आहे. ती कुणाला परवडणार? या सरकारला बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही. सांगण्यात तर त्याहून अर्थ?नाही. इतके गेंडय़ाच्या कातडीचे झालेले लोक आहेत. पाण्याचा थेंब नाही, सूर्य आग ओकतोय, अशा वेळी ज्या सरकारचे डोके चारा छावण्या बंद करण्यापर्यंत जाऊन पोहोचते. ते डोके किती सुपीक असेल? जगातील सगळय़ा बुद्धिवंतांनी खडसे आणि फडणवीस यांच्या बुद्धिमान मेंदूची वाटणी करून घ्यावी. इतिहासकालीन राज्यकर्तेही असे वागले नसते. हे लोकशाहीतील राज्यकर्ते असे वागत आहेत. इतके निर्ढावलेले सरकार जगात नसेल. पाण्याची तडफड होताना लातूरला पाणी एक्स्प्रेस पाठवली. उस्मानाबादला काय पाठवणार? आणि मराठवाडय़ातील तहानलेले जे जिल्हे आहेत तिथे लिम्काच्या बाटल्या पाठवणार काय? परिस्थिती चारही बाजूंनी गंभीर आहे. अशा वेळी विषयाचे गांभीर्य समजून घेण्याची नितांत गरज असते. दुष्काळ यापूर्वी १० वेळा पडलेत. अगदी १९५२चा दुष्काळ घेतला तर तिथपासून २०१६ पर्यंत ६४ वर्षात १० वेळा दुष्काळ पडला. पण त्यावेळी सरकारचे नियोजन होते. दिवसाला एक कोटी रुपये फक्त चा-यावर खर्च होत होते. आजूबाजूच्या राज्यांतून चारा आणला जात होता. पशुधन जगवले जात होते. या सरकारने त्यातील काहीही केलेले नाही. नुसती भाषणे आणि नुसत्या घोषणा. या घोषणांच्या लोकांना कंटाळा आला. मुख्यमंत्र्यांचे दूरदर्शनवरील दर्शन तर बघवत नाही. असे हे बेफिकीर सरकार कोणत्या पापामुळे महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले आहे. ते कोणी स्वरूपानंद दिवसभर चॅनलवर होते आणि त्यांचे एकच वाक्य सांगितले जात होते. ‘महाराष्ट्र के सुखे का कारण साईबाबा की पूजा है’ आता यांची पूजा कोणी करीत नसेल. त्यामुळे ते कोटय़वधींचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांवर येऊन घसरले. अशा मूर्ख माणसाला फार प्रसिद्धी देऊ नये. पण स्वरूपानंद यांना का वाटते की, साईबाबांची पूजा केल्याने महाराष्ट्रात दुष्काळ आला. पण खरी गोष्ट अशी की, भाजपावाले सत्तेवर बसले आणि ही भयंकर परिस्थती निर्माण झाली. इतके संवेदनशून्य सरकार महाराष्ट्रात कधीही नव्हते. युतीच्या काळातील सरकार याहून खूपच चांगले होते. जेव्हा मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री होते. अजून काय झाले आहे? पाऊस पडला तर तो हवाच आहे. चातकासारखी लोक वाट पाहत आहेत. पण नशिबाने दगा दिला तर या राज्यात अराजक निर्माण होईल आणि ते पाण्यावरून असेल. कारण रेल्वेने पाणी पुरवायचे म्हटले तर महाराष्ट्रातील रेल्वेच्या रुळावर पुढचे दोन महिने फक्त पाणी-एक्स्प्रेस चालवावी लागेल. पाणी एक्स्प्रेस धावतील. पण त्यात पाणी आणणार कुठून?
पाणी-एक्स्प्रेस हा एक प्रयोग आहे. तहान तात्पुरती भागवण्याकरिता हा प्रयोग चालू?शकेल. पण हा कायमचा उपाय नाही. मग कायमचा उपाय काय? पाऊस पुरेसा पडेल याची हमी कोण देणार? जमिनीतील सगळा उपसा संपला. निराधार आकाशातून पडणारा पाऊस हाच आता फक्त जगाचा आधार आहे. निदान या महाराष्ट्राचा तरी. तो पडला नाही तर पाण्याअभावी माणसे तडफडून मरतील. एक्स्प्रेसखाली जो कुणी येतो तो चिरडून मरतो. इथे पाण्यावाचून लोकं मरतील आणि म्हणून आता कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय महाराष्ट्राची तहान भागणार नाही. प्रार्थना अशी आहे की, पाऊस वेळेवर यावा, भरपूर यावा, पण तो सपाटून आला की, सगळे खूश होऊन जातील. मग दीर्घकालीन उपायांचे प्रस्ताव कच-याच्या टोपलीत पडतील आणि पुढच्या उन्हाळय़ात पुन्हा पाणी एक्स्प्रेसची चर्चा सुरू होईल. आता त्याच त्याच चर्चा?बंद करून ठोस उपायाची चर्चा करा. त्यासाठी कोणाला तरी भगीरथ व्हावे लागेल. उत्तरेतील गंगा दक्षिणेत आणायला लागेल. पण ती आणायची नसेल तर दक्षिणेच्या पूर्व पट्टय़ात जिथे एवढा मोठा विशाल सागर पसरलेला आहे, त्याचे खारे पाणी गोडे करणे काय अशक्य आहे. जिथे फारसे शिक्षण नाही, ऊर्दू, अरेबिक अशा भाषांशिवाय दुस-या भाषा नाहीत. तिथल्या लोकांनी जर हे प्रयोग यशस्वी केले असतील तर बुद्धिमान महाराष्ट्राला हे का अशक्य आहे? आणि एकदा हे शक्य झाले तर महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा बंद होईल. तसा निर्णय करण्याची हिंमत राज्यकर्त्यांजवळ हवी. अंतुलेंकडे ही हिंमत होती. त्यांनी त्या विषयाला हातही घातला. पण काही चांगले करायला सुरुवात केली की कुलाब्याच्या ससून डॉकपासून सीएसटीपर्यंत सगळय़ा पत्रकारांनी त्यात पाय मारला नाही, असे होणेच शक्य नाही. त्यात अंतुलेंची बदनामी केली. आता कष्टकरी बळीराजालाही बोगस ठरवणारे पत्रकार आहेतच. प्रश्न अडचणीवर मात करण्यासाठी लागणा-या बुद्धीचा नाही. ती बुद्धी महाराष्ट्राजवळ आहे. पण काही चांगले करताना त्या रांगोळीत पाय मारणारे जे स्वत:ला अतिशहाणे समजणारे आहेत. तीच खरी अडचण आहे.