महाराष्ट्रात सध्या सुक्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. हीच बाब लक्षात घेऊन बाबुलनाथ मंदिर प्रशासनाने पाणीबचतीचा निर्णय घेतला.
मुंबई- अपु-या पावसामुळे महाराष्ट्रातील जनता पाण्याविना कोरडी झाली आहे. महाराष्ट्रात सध्या सुक्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. हीच बाब लक्षात घेऊन बाबुलनाथ मंदिर प्रशासनाने पाणीबचतीचा निर्णय घेतला.
बाबुलनाथ मंदिरात रोज पहाटे ५ वाजल्यापासून ते सायं. ४ वाजेपर्यंत जलाभिषेक करण्यात यायचा; परंतु दुष्काळाचे परिणाम लक्षात घेता त्यांनी ही वेळ बदलली आहे. १२ एप्रिलपासून त्यांनी जलाभिषेकाची वेळ पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंतच ठेवली आहे.
महाराष्ट्रातील जनता दुष्काळात होरपळत असताना, तसेच मुंबईतील काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी होत असताना जलाभिषेकासाठी पाणी वाया घालवणं योग्य नाही ही बाब भाविकांच्या लक्षात आली.
पाणी बचतीसाठी जलाभिषेकाची वेळ कमी करण्यात यावी अशी सूचना बाबुलनाथ मंदिरात नित्याने दर्शनास येणा-या भक्तांनी दिली. त्यानंतर बाबुलनाथ मंदिर प्रशासनाने भक्तांची ही सूचना मान्य करत १२ एप्रिलपासून मंदिरात जलाभिषेकाची वेळ कमी केली आहे.
त्याचसोबत त्यांनी जलाभिषेकासाठी वापरण्यात येणा-या तांब्याची उंचीही कमी केली आहे. पूर्वी जलाभिषेकासाठी मोठा कलश वापरण्यात यायचा; परंतु आता त्या कलशाचा आकार लहान ठेवण्यात आला आहे. कमी केलेली वेळ आणि कलशाचा आकार यामुळे दिवसाला २ हजार लिटर पाणी वाचते अशी माहिती मंदिर प्रशासनातील एका अधिका-याने दिली.
महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला आहे. कित्येक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी लोक दूपर्यंत पायी चालत जातात. परंतु त्यांना मुबलकही पाणी मिळत नाही. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भक्तांच्या सूचनांचा मान ठेवत जलाभिषेकाची वेळ कमी केली. जेणेकरून पाणी बचत होईल आणि ज्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे तिथपर्यंत पाणी पोहोचवले जाईल. यामुळे भक्तांच्या श्रेद्धेचा अवमानही होणार नाही आणि देवाची भक्ती केल्याचंही समाधान मिळेल. पाणी बचतीचा हा उपाय इतर भक्तांनाही प्रचंड आवडला आहे. शिवाय इतर सामाजिक संस्था आणि मंदिर प्रशासनाने असे उपक्रम राबविल्यास महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न लवकरच संपेल.
रमेश गांधी, व्यवस्थापक, बाबुलनाथ मंदिर