दहशतवादी हल्ला झालेल्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाला प्रवेश देण्याचा निर्णय राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) घ्यावा, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली
क्यूपेम – दहशतवादी हल्ला झालेल्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाला प्रवेश देण्याचा निर्णय राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) घ्यावा, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.
येथे आयोजित केलेल्या संरक्षण प्रदर्शन ‘डिफेक्सो’नंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, संरक्षण खात्यातर्फे हवाई दलाच्या तळावर प्रवेश देऊ नये अशी स्पष्ट भूमिका आहे. या तळावर सध्या अनेक अडथळे उभारले असून पाकिस्तानी तपास पथकाला तेथे प्रवेश देऊ नये असे माझे आदेश आहेत. मात्र, ही गुन्हा घडलेली जागा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. कारण या प्रकरणाचा तपास त्यांच्यामार्फत सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पथकाला तेथे प्रवेशाबाबतचे अधिकार एनआयएने घ्यायचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण खात्याच्या निर्देशानुसार, गुन्हा घडलेल्या जागी कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मात्र, मी तपासाचे स्वातंत्र्य न दिल्यास संरक्षण खात्यावर आरोप करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानपुढे मोदींची शरणागती
पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानातून आलेल्या तपास समितीला परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरणागती पत्करली आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले करत आहे. पठाणकोट हल्ल्याला आयएसआय जबाबदार असून हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे, असे ते म्हणाले.