युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे स्वत:च पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई- एकीकडे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या मुंबईसह पुण्यातील कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला, तर दुसरीकडे मुंबईतच २० दिवसांपूर्वी झालेल्या पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेंनी हजेरी लावल्याचे उघड झाले आहे. यामुळे पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीतली शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांवर सतत हल्ले होत आहेत, ते दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याने पाकिस्तानी कलाकारांचे भारतात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली.
तर सीमेवर गोळीबार सुरू असताना मुंबईकरांनी पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूला बसून संगिताची मजा कशी लुटायची, अशी मुक्ताफळे शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उधळली होती.
शिवसेनेने गुलाम अली यांच्या मुंबई आणि पुण्यात होणा-या कार्यक्रमांना विरोध केला. परंतू मुंबईत २० सप्टेंबरला ताज लँड्स एन्डमध्ये झालेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार राहत फतेह अली खान यांच्या कार्यक्रमाला मात्र आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती, असे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनीही नुसती हजेरीच लावली नाही तर मंचावरून भाषणही केले होते. त्यावेळी देशप्रेम आणि सीमेवरील जवान का नाही आठवले, असा प्रश्नही आपने विचारला आहे.
या भूमिकेमुळे शिवसेनेवर काँग्रेससह विविध स्तरातून टीका होत आहे. ‘वाराणसीच्या संकटमोचन मंदिरात जर गुलाम अली यांचे गायन होऊ शकते तर मुंबईत का नाही?’ असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे, तर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कोणत्याही कलेला किंवा कलाकाराला विरोध करणे अयोग्य आहे,’ असा टोला मित्रपक्ष शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. सीमेवर पाकच्या कुरापती सुरुच आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानपुढे गुडघे टेकल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे कार्यक्रम रद्द करुन पाकिस्तान सुधरणार आहे का?, असा प्रश्न निरुपम यांनी केला आहे.
गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेमुळे रद्द झाला असला, तरी गुलाम अली यांचा गाण्याचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्याची तयारी तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शवली आहे.
तसेच दिल्ली सरकारनेही त्यांना निमंत्रण दिले आहे. आम आदमी पक्षाचे पर्यटनमंत्री कपिल मिश्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की संगीताला कोणत्याही सीमा नसतात. मुंबईतील त्यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध करणे दुर्दैवी आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पाकिस्तानच्या खेळाडू आणि कलाकारांना विरोध करत आहे. भारतीय नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या पाकिस्तानशी सांस्कृतिक संबंध नको अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. याआधी शिवसेनेने पाकिस्तानी गायकांच्या टेलिव्हिजन रिआलिटी शोमधील सहभागावरून विरोध दर्शविला होता. तसेच पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंना मुंबईतील स्पर्धेतील सहभागी होण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई हॉकी असोसिएशनबाहेर निदर्शने केली होती. त्याआधी वानखेडे मैदानातील क्रिकेटची खेळपट्टी उखडून खळबळ माजवली होती.