ऑस्ट्रेलिया दौ-यातील सराव परीक्षेत भारताचा संघ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.
अॅडलेड – ऑस्ट्रेलिया दौ-यातील सराव परीक्षेत भारताचा संघ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) आमंत्रित संघाविरुद्धची लढत अनिर्णित राहिली तरी पाहुण्यांच्या गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही दमदार सराव केला. भारतातर्फे पाच अर्धशतके ठोकली गेली.
सलामीवीर मुरली विजय, ‘वनडाउन’ चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहलीसह यष्टिरक्षक वृद्धिमन साहा तसेच तळातील करन शर्माने अर्धशतके ठोकल्याने भारताने दुस-या आणि अंतिम दिवशी बुधवारी ८ बाद ३६३ धावा केल्या. १ बाद २१ वरून पुढे खेळताना विजय आणि पुजाराने दुस-या विकेटसाठी ८५ धावा जोडताना आपापली अर्धशतके पूर्ण केली. सहाव्या (५५) आणि नवव्या विकेटसाठी (नाबाद ७८) अर्धशतकी भागीदा-या झाल्या. विजय आणि पुजारासह कोहली आणि साहाने अर्धशतकी मजल मारली. सुरेश रैनाने झटपट ४४ आणि रोहित शर्माने २३ धावांचे योगदान दिले. शिखर धवननंतर (१०) अजिंक्य रहाणे (१) मात्र अपयशी ठरला.
पहिल्या सत्राच्या शेवटी आणि दुस-या सत्राच्या सुरुवातीची काही षटके वगळता भारताच्या फलंदाजांनी प्रतिस्पध्र्याची गोलंदाजी सहज खेळून काढली. उपाहारानंतर कोहली आणि रैनाने भारताला आघाडी मिळवून दिली. साहा आणि करनने फटकेबाजी करताना भारताला चारशेच्या घरात नेले. विजयने आठ, पुजाराने ११ तसेच कोहलीने त्याच्या खेळीत ७ चौकार लगावले. रैना (५ चौकार आणि २ षटकार) आणि साहाने (५ चौकार आणि एक षटकार) फटकेबाजी केलीच. मात्र करन शमाने ५ चौकार आणि २ षटकार लगावत शेपटाची कमाल दाखवून दिली.
पहिल्या सराव लढतीत पहिल्या दिवशी मंगळवारी भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनी अचूक मारा करताना सीए संघाला २१९ धावांत रोखले होते. पाहुण्यांतर्फे वरुण आरोन (३ विकेट) सर्वात यशस्वी ठरला होता. त्याला भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी आणि लेगस्पिनर करन शर्माची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली. उभय संघांमधील दुसरी दोन दिवसीय सराव लढत शुक्रवारपासून (२८ नोव्हेंबर) खेळली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक – क्रिकेट ऑस्ट्रेलिया – २१९ वि. भारत – ८ बाद ३६३ (कोहली ६०, साहा ५६, पुजारा ५५, करन नाबाद ५२, विजय ५१, लॅलोर २२-२). निकाल : सराव लढत अनिर्णित.