२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील पाच मतदान केंद्रावर १५ मे रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश बुधवारी निवडणूक आयोगाने दिले.
कोलकाता – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील पाच मतदान केंद्रावर १५ मे रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश बुधवारी निवडणूक आयोगाने दिले. या केंद्रांवर लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात १२ मे रोजी मतदान पार पडले होते.
या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रातील बिघाड तसेच काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याच्या तक्रारी काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.
बरसात लोकसभा मतदारसंघातील ८२, १४५. २५३, २२५ आणि २२६ या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
नागालँडमध्येही फेरमतदान
नागालँडमध्येही पाच मतदान केंद्रावर १५ मे रोजी मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. वोखरा जिल्ह्यातील सनिस मतदारसंघात गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे फेरमतदान होणार आहेत.