पश्चिम बंगाल व आसाम विधानसभेसाठी सोमवारी पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, तर आसाममध्ये ७२ टक्के मतदान झाले.
गुवाहाटी/कोलकाता- पश्चिम बंगाल व आसाम विधानसभेसाठी सोमवारी पहिल्या टप्प्यातील बंगालच्या १८ तर आसामच्या ६५ मतदारसंघांत मतदान शांततेत झाले. पहिल्या टप्प्यासाठी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दिवसभरात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, तर आसाममध्ये ७२ टक्के मतदान झाले.
या मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प. बंगालच्या पहिल्या टप्प्यात १३३ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात प. मिदनापूर, पुरुलिया व बांकुरा या नक्षलग्रस्त भागात मतदान झाले. १८ पैकी १३ मतदारसंघात दुपारी ४ वाजता मतदान आटोपते घेण्यात आले. तर पुरुलिया, मानबाझार, काशीपूर, पारा, रघुनाथनपूर येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्यात आले.
आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ५३९ उमेदवार रिंगणात आहेत. राज्याच्या विविध भागात विशेषत: भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. ६५ जिल्ह्यात ४० हजार सैनिक तैनात केले आहेत.