राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलिबाग येथील चिंतन शिबिरात शरद पवार यांच्या भाषणाने राजकीय खळबळ उडाली; पण, ती २४ तासांपुरती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या दिवशी बाळासाहेबांच्या समाधीवर जाणारे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना भेटल्यावर वृत्तपत्रांनी लगेच मनोमीलनाचे निष्कर्ष काढून २४ तासांत जी खळबळ उडवली, त्याच पद्धतीने ‘विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला तयार राहा..’ या शरद पवारांच्या हळीने काही काळ खळबळ उडाली.
शरद पवार यांनी १० नोव्हेंबर रोजी केलेल्या निवेदनात महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक होऊ नये, म्हणून भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. विधानसभेतील विश्वास ठरावाच्यावेळी हा पाठिंबा असल्याचे त्यांच्या आमदारांनी दाखवून दिले. १० तारखेच्या निवेदनानंतर अवघ्या आठ दिवसांत निवडणुकीच्या तयारीचे पवारसाहेब बोलले. या निवेदनावर ते किती टिकतील, याची खात्री त्यांनाही नाही. त्यांची निवेदने अशी निसरडी असल्यामुळे त्यावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेब यांची विश्वासार्हता अशा भूमिकांमुळेच घसरलेली आहे. अलिबागच्या भाषणात पवारसाहेबांनी पुन्हा त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष असल्याचा राग आळवलेला आहे; पण, असा धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपाला बिनशर्त पाठिंबा कसा काय देतो, या भूमिकांची संगती लागता लागत नाही. त्यामुळे पवारांची कालची निवेदने आणि आजची निवेदने यात नेहमी वैचारिक गोंधळ असतो. अलिबागच्या भाषणानंतर हा गोंधळ कायम राहिलेला आहे.
मात्र, अलिबागच्या भाषणात पवारसाहेबांनी महाराष्ट्रात हळूहळू पण निश्चितपणे वाढीला लागलेल्या ‘एम.आय.एम.’ (मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन) या संघटनेचा वाढत्या प्रभावाला भाजपाने शक्ती दिल्याचा जो आरोप केला आहे, तो अतिशय गंभीर आहे आणि तो बराचसा खरा आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना मुस्लीम समाजाची जी मते मिळत होती, ती मते तोडण्याकरिता आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाल्याशिवाय काँग्रेस पराभूत होणार नाही, हे राजकीय गणित भाजपाला समजले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत या ‘एम.आय.एम.’ला मदत करण्याची भूमिका भाजपाने घेतली असणारच. शरद पवार यांनी हा जो गंभीर आरोप केला आहे, त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्र विधानसभेत औरंगाबाद आणि भायखळा या दोन विधानसभा मतदारसंघातून ‘एम.आय.एम.’चे उमेदवार निवडून आले आहेत. नांदेड मतदारसंघात ‘एम.आय.एम.’चा महाराष्ट्राचा अध्यक्ष सईद मोईन हा २०व्या फेरीपर्यंत आघाडीवर होता आणि माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांना त्याने घाम फोडला होता. त्याच्याच नेतृत्वाखाली नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११ उमेदवारांना नगरसेवक म्हणून त्याने निवडून आणले. आताही परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये ‘एम.आय.एम.’चे जिल्हाध्यक्ष नेमून पुढच्या निवडणुकीपर्यंत या पक्षाची संघटना वाढवण्याचे काम मराठवाडय़ात अधिक प्रभावीपणे केले जात आहे.
निजामाच्या राजवटीतील हैदराबादमध्ये १९२७ साली स्थापन झालेली ही संघटना कासीम रिझवीच्या हातात म्हणजे रझाकारांच्या हातात १९४५ साली आली आणि या नंतर हैदराबादचा लढा झाला. एक लाख ५० हजार सैन्य असलेल्या निझामाच्या रझाकारी फौजेने भारतीय सैन्याशी लढाई करण्याचा पवित्रा घेऊन हैदराबाद संस्थान स्वतंत्र होऊ न देण्यासाठी ही लढाई केली; पण, पोलादी पुरुष सरदार पटेल यांनी निजामाला शरण आणले आणि ‘एम.आय.एम.’ संघटनेवर १९४८ साली बंदी घालण्यात आली. कासीम रिझवीला तुरुंगात डांबण्यात आले. १९५७पर्यंत कासीम रिझवी तुरुंगात होता आणि पाकिस्तानात जाण्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आले.
१९६०पासून ‘एम.आय.एम.’ ही संघटना हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीत उतरली आणि हैदराबाद विधानसभा निवडणुकीतही विजयी झाली. पुढे तर हैदराबादच्या चार मीनार मतदारसंघात आमदार ‘एम.आय.एम.’चाच राहिला. सुलतान ओवेसी यांनी हैदराबादमधून लोकसभाही जिंकली आणि आता हैदराबादचे महापौरही ‘एम.आय.एम.’चेच आहेत. तेलंगणा राज्य स्वतंत्र झाल्यानंतर तेलंगणाच्या निवडणुकीत ‘एम.आय.एम.’ने प्रवेश करून ७ जागा जिंकल्या. इथपर्यंत ‘एम.आय.एम.’ला ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून निवडणूक आयोगाची मान्यताच मिळाली नव्हती. कारण आंध्रमध्ये त्यांना एकूण मतदानाच्या ६ टक्केही मते मिळालेली नव्हती आणि विधानसभेत जागाही मिळालेल्या नव्हत्या; मात्र आता ही मान्यता त्यांना मिळालेली आहे.
‘एम.आय.एम.’ या राजकीय पक्षातील अकबरूद्दीन ओवेसी हा तेलंगणातील आमदार आहे. त्याची सध्या देशभर जी भडक भाषणे सुरू आहेत, ती भाषणे ऐकल्यानंतर देशाच्या एकात्मतेला आणि सामाजिक ऐक्याला निश्चितपणे बाधा येईल, अशीच ती आहेत.
काँग्रेस पक्षाने नेहमीच देशातल्या अल्पसंख्याक मुस्लिमांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, ही भूमिका आग्रहाने घेतली. त्यातूनच काँग्रेस पक्षाच्या मागे देशातील मुस्लीम मोठय़ा प्रमाणात उभे राहिले आणि संघाच्या आणि भाजपाच्या लोकांनी गेल्या काही निवडणुकांत या राजकीय समीकरणाचा विपरित अर्थ काढून पुन्हा एकदा हिंदू समाजाची मानसिक फाळणी कशी होईल, यासाठी सातत्याने काँग्रेस आणि मुस्लीम समाजाच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका घेतली. संघाचा मुस्लीम समाजाला असलेला उघड विरोध आणि भाजपाचा खासगीतला विरोध यातून िहदुत्ववादाचा नकळत प्रचार करण्यात आला. बहुसंख्य विचारी हिंदू या प्रचारापासून अनेक वेळा दूर राहिले; मात्र, मोदी लाट आल्यानंतर या देशातला भाजपा अधिक आक्रमक झाला. काँग्रेसला मिळणा-या यशाची कारणे त्यांनी हळूवारपणे शोधून काढली आणि िहदूखेरीज बाकी समाजाची जी मते काँग्रेसला मिळतात, त्या मतांचे विभाजन पद्धतशीरपणे कसे होईल, असे डावपेच आखून भाजपाने जी पावले टाकली, त्यामध्येच पवारसाहेबांनी केलेल्या आरोपाचे सत्य दडलेले आहे. मुस्लीम समाज भाजपाला मते देत नसेल तर देऊ दे नकोत. पण, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाल्याशिवाय काँग्रेस पराभूत होणार नाही, हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर ‘एम.आय.एम.’ला भाजपाने मदत, फूस आणि आर्थिक ताकद दिली असणारच, हा पवारसाहेबांचा तर्क बराचसा खरा असला पाहिजे. त्याशिवाय या संघटनेचा विधानसभा प्रवेश सुकर झाला नसता. भायखळा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळचे आमदार मधू चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना २५ हजार मतांची आघाडी दिली होती. हे मधू चव्हाण स्वत: ‘एम.आय.एम.’मुळे पराभूत झाले. औरंगाबाद मतदारसंघात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची अनामत रक्कम जप्त झाली. विधानसभेत दोन उमेदवारांनी प्रवेश केलेली संख्या लहान असली तरी ज्या विचारसरणीने हे दोन आमदार निवडून आले आहेत, ती विचारसरणी सामाजिक वातावरण बिघडवायला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी जी शंका व्यक्त केली आहे, ती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनीही अतिशय रोखठोकपणे या संघटनेबद्दल आपली भूमिका मांडली होती. मात्र, त्यांचा आवाज कमी पडला. आता शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने हा विषय महाराष्ट्रासमोर आणला आहे. म्हणून त्याचा पंचनामा होणे गरजेचे आहे.
[EPSB]
भारताचे शक्तिस्थान : सर्वधर्मसमभाव!
जगात भारताची ओळख नेमकी कशामुळे आहे? जगातल्या १७६ देशांना भारताबद्दल सर्वात मोठे औत्सुक्य कशामुळे आहे? जगातले लोक पर्यटक म्हणून भारतात येतात. ते त्यांच्या भारतातील भ्रमंती काळात ‘काय काय’ पाहतात?
[/EPSB]