मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाचे सरकार होते. मग तेव्हा नोटाबंदीचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची चांगलीच उजळणी घेतली.
मुंबई- नोटाबंदीनंतर देशात सुट्टय़ा पैशांचा प्रश्न गंभीर झाला असून पंतप्रधान मोदी नोटाबंदीचे उदाहरण देत इंदिरा गांधींना दोष देत आहेत. पण मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाचे सरकार होते. मग तेव्हा नोटाबंदीचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची चांगलीच उजळणी घेतली. स्वत:चे कौतुक करून घ्यावे, पण इतरांना दोष देऊ नका, असे सांगत ‘सगळं काही एकटाच करतोय’, असे भासवणा-या मोदींची पवारांनी आपल्या मिश्कील शैलीत चांगलीच खिल्ली उडवली. मोदींच्या कार्यकाळात सीमेवर जास्त हल्ले होत आहेत. त्यामुळे भारतीय सीमा असुरक्षित वाटत असल्याची चिंताही पवारांनी व्यक्त केली. शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला खरा, पण पर्यायी कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे नोटांच्या तुटवडय़ाचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. त्यात सर्वात जास्त हाल शेतकरी आणि कामगारांचे होत आहेत. नोटाबंदी करायची होती, तर आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होती. मात्र कोणतीही आखणी न करता निर्णय घेतल्यानंतर जनतेचे जे हाल होत आहेत, त्याला मोदी सरकारच जबाबदार असल्याचे पवार म्हणाले. मोदी म्हणाले होते की, इंदिरा गांधी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला नाही, पण आम्ही तो घेतला. त्यांच्या या विधानाचा पवारांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. इंदिरा गांधींनी तेव्हा करुन दाखवले नाही ते आज मी केले असे काही मोदी भासवत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही धाडसी आहात, पण प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी गेल्यानंतर मोरारजी देसाईंचे राज्य आले होते. त्यामध्ये जनसुराज्य होते, अडवाणी होते. त्याकाळी का निर्णय घेतला नाही? १३ महिन्यासाठी अटलबिहारी वाजपेयींकडे राज्य होते. त्यानंतर पुन्हा ५ वर्ष सत्ता अटल बिहारी वाजपेयींकडे होती. तेव्हा भाजपाचे यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्यावेळी नोटाबंदीचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल पवार यांनी केला.
इंदिरा गांधींना दोष द्यायला निघालात, पण तुमच्या हाती सत्ता होती, तेव्हा निर्णय घेतला नाही. बरे आता निर्णय घेतला, तर त्याचे कौतुक करून घेताय. निदान दुस-यांवर टीका तरी करू नका, असा टोला पवारांनी मोदींना लगावला. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणायचे की, ‘पाकिस्तानला प्रेमपत्र का पाठवता? एकदाच काय तो बंदोबस्त करा!’, पण आता मोदी यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षभरात आपले ५७ जवान आणि अधिकारी शहीद झाले. त्यामुळे देशाच्या सुरक्षेची मला काळजी वाटते, असेही पवार म्हणाले. नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेले हे तात्कालिक यश आहे. त्यामुळे त्यांनी हुरळून जाऊ नये. गेल्या काही दिवसांमध्ये जे छापे पडत आहेत, त्यात सर्वच्या सर्व नवीन २ हजार रुपयांच्या नोटा सापडत आहेत. एकीकडे लोकांना नोटा मिळत नाही, पण काही धनदांडग्यांकडे नव्या नोटा कशा येत आहेत? ही गंभीर गोष्ट आहे. नेमके हे पैसे कुठून येतात? याची चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली.