देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब, वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्याकडून या अपेक्षा आहेत. तुम्ही त्या पु-या करा…
देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांचा उद्या ७६वा वाढदिवस. बारामतीचे नाव देशात उज्ज्वल करणा-या या राजकीय नेत्याचे आणि सामाजिक नेतृत्वाचे अभिनंदन करताना पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही हा देश भलतीकडे जाऊ देऊ नका. महाराष्ट्र पुरोगामी नेतृत्वाच्या हातात राहील. ही लढाई तुम्हाला लढायची आहे. संघ-भाजपाच्या हातून देश मुक्त व्हायला पाहिजे. महाराष्ट्र मुक्त झाला पाहिजे. तीनपाट लोकांच्या हातात राज्य गेले आहे. त्या विरुद्ध रस्त्यावर उतरून लढा लढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणीबाणीला विरोध झाला होता. आज तेवढाही आवाज उठत नाही आणि म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे. वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्याकडून या अपेक्षा आहेत. तुम्ही त्या पु-या करा.
शरद पवारसाहेबांचा उद्या ७६वा वाढदिवस. ७७व्या वर्षात ते पाऊल ठेवतील. ७७ वे वर्षे लागल्यानंतरही शरद पवार यांची ऊर्जा २७ वर्षाच्या तरुणासारखी आहे. आजचे २७ वर्षाचे तरुण तसेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील सर्वपक्षीय नेते सकाळी ८ ला तयार होऊन कामाला सुरुवात करत नसतील. अनेक जणांना सकाळी सूर्य किती वाजता उगवतो हेही माहिती नसेल. शरद पवार गेली ५० वर्षे सकाळी ७ वाजता तयार होतात आणि ८ वाजता कामाला सुरुवात करतात. त्यांना भेटायला येणा-या लोकांना पवार यांची पूर्ववेळ न ठरवता बरोबर ८ वाजता भेटायला सुरुवात होऊ शकते. पवारसाहेबांची बेल वाजली की, आठ वाजले असे समजावे. वर्षानुवर्षे ही वेळ पाळणे आणि दिवसाचे १५ तास काम करणे, महिन्याचे १५-२० दिवस प्रवास करणे, दौरे करणे, पक्षाचे काम करणे, सामाजिक काम करणे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून एवढी प्रचंड शिक्षण संस्था वर्षानुवर्षे सांभाळणे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सांभाळणे, नाटय़ परिषद सांभाळणे, नेहरू सेंटर सांभाळणे, कुस्ती परिषद सांभाळणे, बारामती विद्याप्रतिष्ठान सांभाळणे आणि बीसीसीआय सांभाळणे.. शिवाय राज्यसभेतील खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद.. किती जागा, किती संस्था, केवढा मोठा व्याप, अगदी दुर्दैवाने आलेल्या आजारपणावर मात करून हा महापुरुष गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरतो आहे.
नुसते सार्वजनिक जीवन नव्हे तर मार्च २०१७ रोजी संसदीय जीवनातील ५० वर्षे शरद पवार पूर्ण करतील. १९६७च्या मार्च महिन्यात वयाच्या २७व्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना बोट धरून राजकारणात आणले आणि तिकीट दिले. प्रदेश काँग्रेसच्या त्यावेळच्या अनेक दिग्गज नेत्यांचे असे मत होते की, ‘शरद पवार यांना ही जागा दिली तर काँग्रेसचा पराभव होईल. कारण विरोधात उभे आहेत बाबालाल काकडे..’ यशवंतराव चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत विचारले की, काँग्रेसला महाराष्ट्रात किती जागा मिळू शकतील? सांगण्यात आले.. १५० जागा मिळायला अडचण नाही. तेव्हा यशवंतराव हसत म्हणाले की, ‘मग १४९ जागा मिळतील, असे समजा. जास्तीत जास्त काय होईल.. तर बारामतीची जागा जाईल.. जाऊ द्या..’ आणि शरद पवार उभे राहिले. २७ हजार मतांनी निवडून आले. नंतर १९६७-७२-७८-८०-८४. मग लोकसभेत खासदार, मग पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री.. एकही निवडणूक न पराभूत झालेला या देशातील हा सर्वात ज्येष्ठ नेता. २७ व्या वर्षी आमदार, ३२ व्या वर्षी राज्यमंत्री, ३४ व्या वर्षी कॅबिनेटमंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५० व्या वर्षी संरक्षण मंत्री, ५९ व्या वर्षी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष.. आणि आजतागायत १७ वर्षे पक्षाचे अध्यक्ष आणि आता सत्ता नसली तरी राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार, महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्व काही.. सत्ता असो नसो.. सत्तेच्या पलीकडचा.. सामाजिक वजन असलेला नेता, त्यांचा जो अधिकार असतो त्याचे अधिकारी फक्त शरद पवारसाहेब आहेत आणि तो त्यांचा अधिकार सर्वमान्य आहे.
त्यांच्या तोडीचा ज्येष्ठ राजकीय नेता आणि सामाजिक नेता आजच्या घडीला तरी या देशात कोणीही नाही. उत्तर भारतात मुलायमसिंग यादव राजकारणात ज्येष्ठ आहेत, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ज्येष्ठ आहेत. पण ती पदावरची माणसे आहेत. पदावरून उतरल्यानंतर ते नेमके कोण आहेत? शरद पवार यांना पदाची गरज नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रातील आजच्या घडीचा सर्वात मोठा माणूस पवारसाहेबच आहेत. ज्या मोदींचा घोडा चौफेर उधळला आहे त्या मोदींचा कान धरण्याचा अधिकार असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे पवारसाहेबच आहेत. तो कान त्यांनी धरावा आणि देशात जे काही चालले आहे त्या विरोधात आवाज उठवावा, अशी अपेक्षा ठेवून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देताना या देशातील पुरोगामी कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे. ज्या पद्धतीने गेली अडीच वर्षे देश चाललेला आहे ते पाहत असताना या देशाच्या मूलभूत मूल्यांची सगळी चौकट मोदी उचकटून मोडून तोडून टाकतील, अशी त्यांची पावले पडत आहेत. नोटाबंदी हा एक विषय. पण नोटाबंदी पूर्वीही या देशातील संसदेला न जुमानणारा पंतप्रधान, या देशातील सर्वोच्च न्यायालयाला न भीक घालणारा पंतप्रधान, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहका-यांना त्यांची वळकटी करून कोप-यात टाकून देणारा पंतप्रधान, अशी हुकूमशाहीची सगळी लक्षणे मोदींच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली आहेत. ते कुणाचीही पर्वा करणार नाहीत. लोकशाहीतील पंतप्रधान म्हणून नाईलाजाने त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे. पण दिलेल्या आश्वासनांचे आपले काही देणे-घेणे आहे, या देशाची काही सामाजिक मूल्ये आहेत. या देशाचा काही सर्वधर्मसमभाव आहे. सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन हा देश मोठा करायचा आहे, ही या देशाची जी मूळ धारणा आहे त्या मुख्य चौकटीला उसकटण्याचे काम मोदी अतिशय पद्धतशीरपणे करत आहेत. नोटाबंदी हा तर त्यांच्या मूर्खपणाचा कळस होता. १२५ कोटींच्या देशाला वेठीला धरणारा पंतप्रधान आणि रांगेतील लोकांची मजा पाहणारा पंतप्रधान.. याच रांगेत जे ७५ लोक मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल एका शब्दाची संवेदनाही न व्यक्त करणारा पंतप्रधान, आज या देशाच्या डोक्यावर बसलेला आहे. त्याच्याविरोधात आवाज उठवण्याकरिता पवारसाहेब तुम्हीही रस्त्यावर उतरले पाहिजे, तुम्ही आवाज दिला पाहिजे, तुम्ही एका राजकीय आर्थिक अराजकाला थोपवण्याकरिता जनआंदोलन उभे करण्याची हाक दिली पाहिजे, ही तुमच्याकडून अपेक्षा आहे.
तिकडे उत्तर भारतातील कोणीही बोलत नाहीत. ना मुलायमसिंग बोलत.. ना नितीशकुमार बोलत.. एकटय़ा ममता बॅनर्जी चवताळून वाघिणीसारख्या पुढे आल्या. पण त्या एकाकी पडल्या. आज देशात जे काही आर्थिक अराजक निर्माण होत आहे.. कोणतीही पूर्व तयारी न करता नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला.. काळापैसेवाले मस्त मजेत आहेत. कोणाच्या केसाला धक्का लागला नाही. अंबानी-अदानी यांचा बाल वाकडा झाला नाही. वेठीला धरली सामान्य माणसे. देशात याविरुद्ध आवाज उठत नाही. अडीच वर्षात महागाई तिप्पट झाली.. आवाज नाही, संसदेत निवेदन नाही. दिलेल्या आश्वासनांतील एकही आश्वासन पूर्ण नाही. धार्मिक उन्माद शिगोशिग वाढला. भागवतांना महत्त्व आले. संघाला महत्त्व आले आणि पुरोगामीपणाची सगळी कवचकुंडले आज मोदी आणि त्यांचे सरकार मोडून तोडून टाकत आहेत. इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा त्या विरोधात देशात केवढा मोठा आवाज उठला. पवारसाहेब, तेव्हा तुम्ही इंदिराजींच्या पक्षात होतात. देशातल्या त्यावेळच्या विरोधी पक्षाने केवढा आकांत केला. एस. एम. जोशींसारखे नेते, ज्यांना इंदिराजींनी अटक केली नाही तरी उभा देश बंदिवान झाल्यासारखा झाला. १८-१८ महिने अनेक कार्यकर्ते तुरुंगात गेले. तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणीबाणीविरुद्धचा क्षोभ हा बहुजनांचा नव्हता. मूठभर नेत्यांचाच होता. पण तरीही वृत्तपत्रांवर आलेले निर्बंध, त्याचा निषेध अग्रलेखाच्या जागा को-या सोडून पत्रकारांनी केला. आज सगळय़ात खंत वाटणारी गोष्ट कोणती असेल तर आणीबाणीला ज्या आवाजात विरोधात झाला त्या आवाजात किंबहुना त्यापेक्षा क्षीण आवाजातसुद्धा आज मोदींच्या आरेरावीला, त्यांच्या हुकूमशाहीला, संसदेला कस्पटासमान मानना-या प्रवृत्तीला आणि सर्वोच्च न्यायालयाही न जुमानणा-या प्रवृत्तीविरुद्ध देशात आवाज उठत नाही. कसली एवढी भीती वाटत आहे? कोणाची भीती वाटत आहे? मोदी जास्तीत जास्त काय करतील? तुरुंगात टाकतील.. त्यांना आवडलेला शब्द ‘देशद्रोह’.. त्याचा खटला भरतील. तुरुंगात छळतील. जास्तीत जास्त काय करतील, मारून टाकतील. आज त्या कशाहीची पर्वा न करता या देशाच्या सगळय़ा मूलभूत मूल्यांची चौकट विस्कटली जात असताना लोकशाही टिकवण्याचा हा लढा, पवारसाहेब लढावा लागणार आहे. पडेल ती किंमत देऊन लढावा लागेल. २०१९ साल जवळ येऊ द्या.. मोदी लोकसभेची निवडणूक घेणार नाहीत.. त्यावेळी ते काय नौटंकी करतील हे आज सांगता येत नाही. पण हे लिहून ठेवा.. २०१९ची लोकसभेची निवडणूक मोदी घेणार नाहीत. काय बहाणा दाखवतील माहिती नाही. लटुपुटुचे युद्धही करतील. काय हवे ते करतील. संपूर्ण लोकशाही वेठीला ते धरू शकतात. जर देशातील १२५ कोटी जनतेला आपलेच पैसे मिळवण्यासाठी ते वेठीला धरू शकतात तर लोकशाहीचे काय घेऊन बसलात.. अमर्त्य सेन यांच्यासारखे अर्थशास्त्रज्ञ जे आज परदेशात आहेत.. ते परदेशातून सांगतात, ‘मोदी हे हुकूमशहा आहेत.’ जे त्यांना लांबून दिसते ते या देशातील विरोधी नेत्यांना का दिसत नाही?
पवारसाहेब, तुमच्या उद्याच्या ७६व्या वाढदिवशी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देताना हा अप्रिय विषय काढायला नको होता.. पण पर्याय नाही. सगळ्या बाजूंनी कोंडी होत आहे. सामान्य माणसे घाबरल्यासारखी आहेत. नेते घाबरलेत. चिल्लर लोकांना महत्त्व आले आहे. ज्या काँग्रेसच्या लोकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपा आणि मोदींनी रण माजवले होते आणि लोकांना मूर्ख बनून सत्तेवर आले त्याच भाजपाच्या मंत्रिमंडळात चोर आणि डाकू बसलेत. ९१ लाख रुपये आपल्या गाडीत पळवणारा महाराष्ट्राचा सहकारमंत्री आहे. गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याला क्लीनचिट देतोय. भ्रष्टाचाराला पाठी घालणारा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तेवढाच भ्रष्ट ठरतो. त्यांचे नागपूर आता गुंडांचे शहर होत आहे. कोणाला कशाची लाज नाही आणि कुठे आवाज उठत नाही. मी मी म्हणणारे पत्रकार आरत्या ओवाळत आहेत, मुलाखती झडवत आहेत, कौतुक सोहळे सुरू आहेत. पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का पवारसाहेब? या सगळय़ांचा विचार तुम्हाला करावा लागेल. तुम्ही आवाज दिलात तर महाराष्ट्राचे वातावरण उद्या बदलेल. एक लक्षात घ्या.. या पुरोगामी महाराष्ट्रात अस्सल ढोंगी आणि नतद्रष्टांचे राज्य आले आहे. भ्रष्ट असलेल्यांचे राज्य आहे. दिसायला सोज्वळ आहेत, भाषणे चारित्र्याची आहेत पण हे सगळे ढोंग आहे. पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचार असलेल्यांच्याच हातात हे राज्य असले पाहिजे आणि असलेले राज्य उलटवण्याची धमक, पवारसाहेब, तुमच्यामध्येच आहे. तेव्हा मोदींचे कौतुक करू नका.. सार्वजनिक जीवनात लोकांना हे कौतुक आवडत नाही आणि तुम्हीच जर कौतुकाची आरती घेऊन उभे राहिलात तर महाराष्ट्राचा ‘निकाल’ लागला म्हणून समजा..
आणखी एक गोष्ट जीव तोडून तुम्हाला सांगतो.. मेहरबानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना अहंकारातून बाहेर काढा. जर दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले तर दोघेही मेले.. हे लिहून ठेवा. काँग्रेसवर आरोप करत बसू नका. राष्ट्रवादीवर आरोप करण्याच्या भानगडीत काँग्रेसने पडू नये. दोघांनी समजुतीने आणि शहाणपणाने निर्णय केला तर महाराष्ट्रात या दोन पक्षांच्या आघाडीपुढे भाजपाचा पालापाचोळा होईल. मोदींच्या कितीही सभा झाल्या तरी पुरोगामी महाराष्ट्रात या ढोंगी लोकांना महाराष्ट्र थारा देणार नाही. कोण कालचे फडणवीस.. आणि काय मिज्जाशीत बोलताहेत.. आणि ते महाराष्ट्राने ऐकायचे.. पवारसाहेब, दोन्ही पक्ष एक व्हा, आघाडी करा. नगर परिषदेच्या निवडणुकांत आघाडी असती तर भाजपाला धो धो धोपटले असते. विधानसभा निवडणुकीत आघाडी असती तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे १६२-६३ पर्यंत आमदार निवडून आले असते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या उरावर बसूनसुद्धा भाजपाला बहुमत मिळवता आलेले नाही. १२३ आमदारांमध्ये २७ तुमचे आणि ३७ काँग्रेसचे.. त्या त्या पक्षातून तिकडे जाऊन निवडून आले. ही स्थिती समजून घ्या. आकडेवारी तपासा. तुमच्या पक्षाच्या लोकांना कामाला लावा. सोनियाजींना भेटा. आघाडीचे महत्त्व त्यांना पटवून द्या.. राहुल गांधींना भेटा.. या सगळ्यात तुम्ही पुढाकार घ्या.. राहुल गांधींना भेटण्यात थोडा कमीपणा वाटला तरी, तो घ्या. हा कमीपणा महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला घ्यावा लागेल. काँग्रेसमध्ये असे बरेच लोक आहेत.. ज्यांना आघाडी नको आहे. आघाडी झाली की तुमचे महत्त्व वाढेल, अशा व्यक्तिगत अहंकारात काँग्रेसच्याच लोकांनीच काँग्रेसला डुबवले आहे.
विधान परिषद निवडणुकीत आघाडी झाली नाही. काय झाला परिणाम पवारसाहेब? आघाडी झाली असती तर काय निकाल आला असता? कारण नसताना २-४ जागांसाठी अहंकाराचे विषय मोठे करून मुख्य लढाईकडे दुर्लक्ष झाले. विधान परिषदेच्या दोन जागा त्या काय.. त्याचे महत्त्व किती आहे? ती लढाई महत्त्वाची आहे की, या राज्यातून भाजपाच्या राजवटीला हुसकवून लावणे ही लढाई महत्त्वाची आहे? कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे.. तेव्हा हा सगळा विचार तुम्ही शांतपणे करू शकता आणि तो करणे अत्यंत गरजेचे आहे. आघाडी झाली पाहिजे या मताचे नेते काँग्रेसमध्ये आहेत. श्री. नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘आघाडी व्हायलाच हवी’, बाळासाहेब थोरातही तेच म्हणाले. कारण मतदानाचे आकडे समोर आहेत. तुमचा पक्ष किंवा काँग्रेस कोणत्याही एका पक्षाला महाराष्ट्रात स्वबळावर भाजपाचा पराभव करता येईल आणि बहुमत मिळवता येईल, ही शक्यता अजिबात नाही. आणखी एक गोष्ट लिहून ठेवा.. उद्धव ठाकरे कितीही गरजले तरी राजनाथ सिंहच्या एका फोनने ते घाबरून जातात. मोदी बोलले तर पाचावर बसेल? तेव्हा भाजपा-सेनेची युती होणार हे पक्के समजा. नोटाबंदीनंतर जी काही गुरगूर सेनेने केली त्याचे खरे कारण मोदींनी उद्धव ठाकरेंना आगोदर कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्यांची पंचायत झाली हे आहे. तेव्हा दाखवण्याचा संताप, ‘सामना’मधील संताप हा शिवसैनिकांना सांभाळण्यासाठी आहे. शिवसैनिकांना युती नको आहे, मात्र, मातोश्रीच्या हालचाली वेगळ्या आहेत. वेळ आली की सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडतील आणि म्हणून रात्र वै-याची असताना पवारसाहेब, तुम्ही जागे राहा. फक्त तुम्ही आणि तुम्हीच महाराष्ट्रात हे घडवू शकता. देशाचे काय व्हायचे ते होईल. महाराष्ट्रात तरी संघवाल्यांच्या हातात राज्य असता कामा नये आणि ते ठेवायचे असेल तर मग शाहू, फुले, आंबेडकर या परंपरा आणि त्यांचे पुरोगामित्व यावर भाषण करण्याचा आपल्या कुणालाच अधिकार नाही. आम्हा पत्रकारांनाही तो अधिकार राहिलेला नाही. सगळे चॅनेलवाले मोदीमय झालेत. कोण ते रावसाहेब दानवे.. महाराष्ट्रासाठी त्यांचे योगदान काय? महाराष्ट्राच्या विकासात ते कुठे आहेत? पण नगर परिषद निवडणुकीनंतर फलक लागले ‘रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली नगरपरिषदेत मिळालेल्या विजयाबद्दल दानवे यांचे अभिनंदन..’ पवारसाहेब, हे असे विजयाचे श्रेय घेणारे ‘दानव’ महाराष्ट्रात नाक्यानाक्यांवर बसलेले आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्र कुरतडून टाकत आहेत. राज्य भलतीकडेच चालले आहे. सहकार उखडून टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. २२ लाख लोकांना रोजगार देणारा सहकार भाजपाच्या डोळ्यांत सलतो आहे. कारण त्यांच्या हातात या संस्था नाहीत. खासगी शिक्षण संस्था त्यांना डोळय़ांत सलत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ५० वर्षात जे काही काम उभे राहिले ते मोडून-तोडून टाकावे, असल्या अभद्र विचारांनी ही माणसं महाराष्ट्राचा नाश करायला निघाली आहेत. ग्रामीण जिल्हा बँका संपवून टाकायच्या.. कारण शेतक-यांशी भाजपाचा काहीच संबंध नाही. यांचा सगळा रस आहे तो ग्राहकाला संरक्षित करण्याचा. शहरे सांभाळायचा. आणि शहरातील लोकांना असे दाखवायचे की, तुमचे तारणहार आम्हीच आहोत. कारण शहराची वाढती लोकसंख्या ही भाजपाला अनुकूल झाली तर त्याच शहराच्या मतावर राज्य मिळू शकते. हे गणित त्यांनी मांडून ठेवलेले आहे. ‘स्मार्ट सिटी’ त्याकरिता आहे. खेडय़ाची, खेडय़ातील शेतक-यांची यांना पर्वा नाही आणि गरज वाटत नाही. पवारसाहेब, या सगळ्या अराजकाविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी तुमची आणि तुमची आहे. तुम्ही रस्त्यावर उतरण्याचा आवाज दिला तरच हे घडू शकेल.