कोकणावर निसर्ग संपत्तीची मुक्तहस्ते उधळण करणा-या परमेश्वराने कोकणाला दारिद्रय़ाचा शापही दिला असावा, पण जेव्हा केव्हा परमेश्वराने हा शाप दिला असेल तेव्हाच, कोकणी माणसाने दारिद्रय़ाशी झुंज देऊन त्यावर मात करण्याचाही पण केला असेल. कोकणातील जुन्या पिढीने दारिद्रय़ाचे चटके जरूर सोसले. पण तरुणांच्या नव्या पिढीने आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचे नवनवे मार्ग शोधले. अनेक तरुणांनी लक्षावधी रुपयांचे कर्ज काढून डंपरद्वारे वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. बराच काळ सुरळीत चाललेल्या या व्यवसायाला अलीकडे मात्र महसूल आणि पोलीस यंत्रणेतील कर्मचा-यांनी ग्रहण लावले. कसलेही कारण नसताना डंपरमालक आणि चालकांवर दंडात्मक कारवाया करून त्यांची अडवणूक सुरू केली. या दंडेलीला वैतागून डंपरमालक आणि चालकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन सुरू केले. वास्तविक हे आंदोलन सर्वपक्षीय होते, पण पोलिसांनी मात्र कारवाई केली ती काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यर्त्यांविरोधात. नितेश आणि ३८ कार्यकर्त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय स्थानिक न्यायालयाने दिला. जर आंदोलन सर्वपक्षीय होते, तर पोलिसांची कारवाई फक्त नितेश यांच्या विरोधातच कशी झाली? शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेसमधून आता भाजपामध्ये दाखल झालेले आमदार राजन तेली कोणत्या बिळात लपून बसले होते? रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर अधूनमधून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध तेच तेच घिसेपिटे मुद्दे उकरून, काढून आंदोलन करायचे आणि श्री. नारायण राणे यांची बदनामी करायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यावर आणखी एखादा विषय उकरून काढून राणे यांच्यावरच शिंतोडे उडवायचे हा खासदार विनायक राऊत यांचा आवडता धंदा. कोकणात गेल्यावर नारायण राणेंना शिव्याशाप देऊन झाले की, मुंबईत येऊन मातोश्री गाठायची आणि उद्धवजींसमोर हुजरेगिरी करण्याची आणखी एक सवय या राऊतसाहेबांनी अंगी बाणवल्याचे दिसते. आमदार राजन तेली यांच्याबद्दल काय बोलावे? कुणालाही शक्य झाले नसते अशा अत्यंत अवघड राजकीय परिस्थितीत आपले सारे राजकीयकौशल्य पणाला लावून नारायण राणे यांनी राजन तेली यांना विधान परिषदेवर निवडून आणले. पण राज्यातून काँग्रेसची सत्ता जाताच या राजन तेलींनी आपला ‘घाणा’ भारतीय जनता पार्टीच्या सेवेस ‘जुंपला’ आता विधान परिषदेची आपली मुदत संपेपर्यंतच राजन तेली आमदार राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर सिंधुदुर्गात बसायचे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्तेगिरी करायची हेच भोग तेली यांच्या नशिबी येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने बाहेर काढले आणि बाहेर इतर कोणी विचारत नाही अशा अवस्थेत संदेश पारकर सध्या आला दिवस ढकलताना दिसतात. वैभव नाईक यांच्याबद्दल काय बोलावे? ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले खरे, पण विधानसभेत कसलाही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेले इतर अनेक आमदार असतात तसे वैभव नाईकही आहेत.
रविवारी भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रवेश कार्यालयात भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांची सिंधुदुर्गातील आंदोलनासंदर्भात पत्रकार परिषद पार पाडली. या पत्रकार परिषदेच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डंपर मालकांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपण या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कोकण आयुक्तांची समिती नेमली असून त्यांचा अहवाल येताच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची उचलबांगडी करून टाकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. एखादे शिष्टमंडळ काहीतरी मागणी करते आणि त्यावर एखाद्या जिल्ह्यातील दोन अतिमहत्त्वाच्या अधिका-यांची बदली करण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री मोकळे होतात इतक्या वेगाने राज्याच्या प्रशासनाचा गाडा मुख्यमंत्री फडणवीस हाकत असतील तर त्यांचे कौतुकच करायला हवे. वस्तुस्थिती कदाचित अशी असावी की, भंडारी, विनायक राऊत आणि कंपनीचे रटाळ संभाषण ऐकून मुख्यमंत्री वैतागले असावेत आणि काय केले म्हणजे हे लोक लवकर कटतील याचा विचार करून त्यांनी भंडारी आणि शिंदे यांच्या उचलबांगडीचे आश्वासन देऊन शिष्टमंडळाला काही क्षणात वाटेला लावले असावे.
जेव्हा लोकहिताच्या एखाद्या प्रश्नावर सर्वपक्षीय आंदोलन उभे राहते तेव्हा ते आंदोलन विस्कळीत होणार नाही आणि पक्षीय मतभेद असले तरी राजकारणाचे जोडे बाजूला करूनच आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते, पण सिंधुदुर्गातील डंपर मालक आणि चालकांच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने पद्धतशीरपणे आपले राजकारण घुसडून नारायण राणे आणि नितेश राणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जर आंदोलन सर्वपक्षीय होते तर नितेश राणे यांची सुटका होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घ्यायला हवी होती. पण असे काही करण्याऐवजी खासदार विनायक राऊत, राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन तेली यांनी आपापल्या आलिशान गाडय़ांतून मुंबई गाठणे पसंत केले. आपल्याला वा-यावर सोडून नेते मुंबईला पळाले, अशी भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली, तर त्यांना दोष कसा द्यायचा? पण आमदार नितेश राणे यांनी असे केलेले नाही, आपले आंदोलन तडीस नेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून तुरुंगात जाणे पसंत केले आहे. आपल्यासाठी आंदोलन करणारा आपला नेता तुरुंगात गेला आहे ही भावनाही कार्यकर्त्यांना बळ देणार आहे.
या सगळ्या प्रकरणात राजकारण कुणी केले हे सिंधुदुर्गातील लोकांना खूप चांगले कळले आहे. या आंदोलनात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही जखमी झाले हे कुणीही नाकारणार नाही, पण पोलिसांचा मार खाऊन जखमी झालेल्या या कार्यकर्त्यांना तिथेच वा-यावर सोडून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मिरविण्यासाठी मुंबईला जाणे पसंत केले. सिंधुदुर्गातील लाल मातीशी इमान राखणारे कोण आणि या मातीशी बेईमानी करून नको तिथे पाय लावून मुंबईला पळणारे कोण याचा हिशेब योग्य वेळी सिंधुदुर्गातील जनता नक्की करील याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. जेव्हा कधी निवडणुका येतील तेव्हा कोकण आमचेच असे म्हणणारे पाच वर्षानी जेव्हा अवतरतील तेव्हा त्यांनाही सगळे हिशेब चुकवावे लागतील.