दादरीच्या घटनेने सरकारची प्रतिमा मलीन झाली, असे सांगण्याचे धाडस संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले आहे. पर्रिकर यांना या धाडसाची कदाचित शिक्षा मिळू शकते.
जेव्हा एका गरीब मुस्लीम शेतक-याच्या घरी गोमांस शिजवले जात आहे, अशा निव्वळ अफवेमुळे जर २०० हिंदूंचा जमाव मोहम्मद इखलाकला खतम करून टाकत असेल, तर ज्याच्या घरात गोमांस शिजत असेल त्याचे अख्खे घर पेटवून द्यायला, हे धार्मिक उन्मादवादी लोक कमी करणार नाहीत. गोध्रा, बाबरी आणि दादरी या घटनांच्या मालिकेत मानसिक फरक आहे, असे मानता येणार नाही. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे सांगायचे की, ‘ज्याला जे आवडेल ते त्याने खावे’ आणि दुसरीकडे निव्वळ अफवेतून एका मुस्लीम शेतक-याची हत्या व्हावी, हे अचानक घडू शकते काय? दोनशे माणसे संघटित होण्यास काही वेळ लागेल की, नाही? दोनशे माणसे अवघ्या पाच मिनिटात कशी काय संघटित होतात? याचा अर्थ हाच आहे की, अफवा उठवून संघटित हल्ला करायचा. बाबरीचा हल्ला जसा पूर्वनियोजित होता तसा दादरीचा हल्लासुद्धा पूर्वनियोजित होता आणि आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना भाजपाची प्रतिमा मलीन झाल्याचे जाणवले; पण पर्रिकरांनी अर्ध सत्य सांगितले. पूर्ण सत्य सांगितले नाही. कदाचित त्यांना मोदींचे भय वाटले असावे. त्यामुळे दोनशे जणांनी एका व्यक्तीला ठार मारणे, ही घटना ‘स्थानिक’ आहे, असे संरक्षणमंत्र्यांना वाटते. कसाबने मुंबईवर जेव्हा हल्ला केला होता तेव्हा आर. आर. पाटील यांना गांभीर्य कळले नव्हते. त्यांनी म्हटले होते की, ‘ऐसे बडे शहरो में छोटी छोटी घटना होती रहती है’ पर्रिकरांचा ‘आबा’ झालेला आहे. ज्या हत्येने सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मलीन झाली ती घटना ‘स्थानिक’ कशी? या बातम्या स्थानिक आहेत, हेच असत्य आहे जर धार्मिक उन्मादातून कोणाही नागरिकाची हत्या झाली तर ती बातमी देशपातळीवरची होणारच! संरक्षणमंत्र्यांना असे म्हणायचे आहे का की, हत्या करणारच पण त्याची बातमी होता कामा नये! हे तत्त्वज्ञान भयंकर आहे! पर्रिकरांना असेही वाटते आहे की, अशा बातम्यांना प्रसिद्धी देता कामा नये. म्हणजे हत्या करा; पण प्रसिद्धी देऊ नका! पर्रिकरांना हे मुद्दाम सांगितले पाहिजे की, तुमच्या पक्षाच्या प्रतिमेची तुम्हाला एवढी काळजी असेल तर धार्मिक उन्मादाला प्रथम आवर घाला!
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीसुद्धा भीती व्यक्त केली आहे की, देशात असहिष्णुता वाढत आहे. देशातील विचारवंत पुरस्कार परत करत आहेत. असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक उन्माद वाढला आहे. कारण ‘आता आमचे सरकार आले आहे,’ असे या धटिंगण प्रवृत्तींना वाटत आहे. त्यातून व्यक्तिगत जीवनातील हिंसक अराजकाची सुरुवात झाली असून त्याचे रूपांतर सार्वजनिक अराजकात कधीही होऊ शकेल!
गिरणी कामगारांची वाताहत
मुंबईतला गिरणी कामगार हे मुंबईचे एकेकाळचे वैभव होते. श्रम करणारा हा गिरणगावातला अडीच लाख कामगार मुंबई जागती ठेवत होता. मुंबईचा कापड उद्योग याच कामगारांच्या श्रमातून बहरला होता. त्यामुळे नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवीने ‘कामगार ही तळपती तलवार आहे..’ अशा शब्दांत या कामगार शक्तीचे वर्णन केले होते. दुर्दैवाने काळाच्या ओघात तळपती तलवार राहिली नाही. गिरणी कामगाराला कुचलून टाकण्यात आले. गिरण्या बंद पडल्या आणि अडीच-तीन लाख कामगार अक्षरश: देशोधडीला लागले. याच गिरणी कामगारांनी बोनसचा हक्क मिळवून दिला होता.?‘बारा महिन्यांच्या कामाला तेरा महिन्यांचा पगार’ हे सूत्र?याच कामगारांनी संपाचे हत्यार उपसून सिद्ध केले होते. गिरणगावातली गिरणीची धुरांडी आणि सकाळचा तो भोंगा ही या मुंबईची चेतना होती. आज हे सर्व इतिहासजमा झाले आहे. गिरणी कामगारांना रस्त्यावर टाकण्यात आले. मुंबईतला गिरणी कामगार रोजगार गेल्यानंतर आता आपल्या निवा-यासाठी सरकारकडे याचना करत आहे. ऑक्टोबर २०१४ ला फडणवीस सरकार अधिकारात आले. डिसेंबर २०१४मध्ये गिरणी कामगारांना घरे देऊ, असे आश्वासन याच फडणवीस यांनी दिले होते. त्याला दहा महिने होऊन गेले. एकाही गिरणी कामगाराला घर मिळाले नाही. कबूल केलेल्या करारानुसार निवारा मिळू शकला नाही. या स्थितीमध्ये गिरणी मालकांनी म्हाडाकडे ज्या जमिनी गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरीत केलेल्या होत्या, त्या जमिनीवरही घरे बांधण्यात आलेली नाहीत. या उलट बॉम्बे?डाईंग किंवा श्रीनिवास मिल बगीच्यासाठी दाखवलेले आरक्षण रद्द करून तिथे गिरणी कामगारांची घरे व्हावीत, या मागणीलाही केराची टोपली दाखवली गेली. एवढेच नव्हे तर मुंबईतल्या दहा गिरण्यांमध्ये कामगारांची थकबाकी अजून दिली गेलेली नाही. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून ही थकबाकी देणे अजून बाकी आहे. अशा स्थितीत मुंबईतले गिरणी कामगार अजून शांत बसून आहेत. अर्ज, विनंत्या करीत आहेत. वर्षपूर्तीचा उत्सव सरकार साजरे करीत आहे. पण, गिरणी कामगाराला मात्र वा-यावर सोडण्याची भूमिका घेतलेली आहे.?या स्थितीत फडणवीस सरकार गिरणी कामगारांना न्याय कधी देणार? गिरणी कामगार रस्त्यावर उतरावा, त्याने सर्व शक्ती पणाला लावावी, मोर्चे काढावेत, याशिवाय सरकारला जाग येणार नाही का? मुंबईच्या गिरणी कामगारांची चेष्टा करू नका, एवढेच सरकारला सांगायचे आहे.