अंध विद्यार्थ्यांना परीक्षेला लेखनिक मिळवून देणं, अभ्यास किंवा अवांतर वाचनासाठी वाचक पुरवणं, विद्यार्थ्यांसाठी इतर अनेक प्रकल्प राबवण्याचं काम परिमला भट्ट त्यांच्या ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून करत आहेत. संस्थेने येत्या 21 ऑगस्टला तेराव्या वर्षात पर्दापण केलं आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या आणि परिमला भट्ट यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
‘जिन्यांवरून पळत जाणं आणि खूप आरडाओरड करणं मला लहानपणी खूप आवडायचं.’ आपल्या बालपणाबद्दल बोलताना परिमला भट म्हणजे परीताई लहान होतात. सेंट डुरेलो कॉन्व्हेन्ट स्कूलची त्या विद्याíथनी. जेवढी मस्तीखोर तेवढीच हुशार. मोठं होऊन काहीतरी करून दाखवण्याची तिची महत्त्वाकांक्षा लहानसहान गोष्टींतून प्रकट होत असे. डोळस मुलांसोबत स्टेजवरील नृत्याचे कार्यक्रम असोत, शाळेबद्दल पाहुण्यासमोर अचानकपणे बोलणं असो किंवा शाळेतल्या सातवीच्या विद्यार्थिनींमधून आपलं कानातलं चोरणा-या मुलीला केवळ तिचा आवाज आणि स्पर्शावरून ओळखणं असो.. छोटया छोटया गोष्टींमधून तिची ‘बुद्धिमत्ता’ सर्वानाच दिसत होती. शिक्षणात अव्वल असलेल्या या मुलीला सातवीनंतर काही कारणांमुळे कॉन्व्हेन्ट स्कूल सोडून छबिलदास या मराठी माध्यमाच्या शाळेत जावं लागलं. पण, शाळा कोणतीही असली तरी तिचं वेगळेपण लपण्यासारखं नव्हतं. सुरुवातीपासूनच डोळस लोकांमध्ये वावरत असलेल्या परीताईला नव्या शाळेत, नव्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळायला वेळ लागला नाही. ती एसएससी उत्तीर्ण झाली आणि रुईया महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला.
महाविद्यालयात प्रवेश घेतानाही परिमला यांची आकांक्षा मेडिकलचं शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची होती. पण आपण अंध असल्याने ते शक्य होऊ शकत नाही, याचीही त्यांना जाणीव होती. म्हणूनच मानसशास्त्राचं शिक्षण घेऊन त्याचा वैद्यकीय परिप्रेक्ष्यात उपयोग करण्याचं ठरवलं. पहिली दोन वर्ष तिने रुईयात तर पुढली दोन वर्ष रुपारेल महाविद्यालयात काढली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण कशात घ्यावं, असा प्रश्न त्यांना पडला तेव्हा आजवरच्या अभ्यासाचा ज्या क्षेत्रात अधिक वापर करू शकतो, अशा समाजकार्याचीच त्यांनी निवड केली. वेगवेगळ्या कारणांनी समाजापासून दुरावलेल्या घटकांसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली.
आदिवासी लोकांसोबत सहा महिने राहून त्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेण्याची संधी असलेल्या प्रकल्पात परिमला कार्यरत होत्या. दादर येथील कमला मेहता अंधशाळेत त्यांनी समाजसेविका म्हणून मुली आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. ‘नॅब’ या अंधासाठी काम करणाऱ्या संस्थेत महिलांची प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि मलेशियात ‘भारतातील अंध स्त्रियांची स्थिती’ या विषयावर आपला प्रबंधही सादर केला. पण यशाची शिखरं चढत असताना दृष्टिहीन असल्याने किती अडचणींना तोंड द्यावं लागतं. हे परिमला यांना प्रकर्षाने जाणवलं. शाळेत असेपर्यंत या अडचणी तेवढय़ा प्रमाणात जाणवल्या नाहीत. पण, महाविद्यालयीन शिक्षण घेताना आणि विशेषत: ‘एमएसडब्ल्यू’ करताना अभ्यास कसा करावा, हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शाळेत असताना ब्रेलमधून काही पुस्तकं उपलब्ध असत.
कॉलेजमध्ये त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि घरातले, अगदी शेजारीही आळीपाळीने अभ्यास वाचून दाखवत. पण ‘एमएसडब्ल्यू’सारखा व्यावसायिक अभ्यासक्रम करताना तिचा अभ्यास वाढल्याने व्यावसायिक आणि हौशी वाचकांची गरज भासू लागली. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आपली ही अडचण सांगितली. त्यांच्यापैकी काहींनी त्यांना मदत करायला सुरुवात केली. एकदा वाचून अभ्यास लक्षात राहणं कठीणच. परिमलाने त्यावरही तोडगा काढला. संपूर्ण अभ्यासक्रम ध्वनीमुद्रित करायचा. त्यामुळे कोणताही धडा ती कधीही आणि कुठेही वाचू लागली. पण नोट्स, पुस्तकं मिळवून त्या कोणाकडून तरी वाचून ध्वनीमुद्रित करणं आणि मग अभ्यास करणं अतिशय वेळखाऊ आहे. तसंच त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर आणि पर्यायाने प्रगतीवर होतो, असं त्यांच्या लक्षात आलं.
यातूनच शिकणा-या अंध विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत व्हावी म्हणून काय करता येईल, असा विचार त्यांच्या मनात आला आणि 21 ऑगस्ट 2000 रोजी ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था मुंबईतल्या महाविद्यालयात अकरावीच्या पुढे उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना वाचक आणि लेखनिक पुरवते. हे वाचक आणि लेखनिक ‘स्नेहांकित हेल्पलाइन’चे स्वयंसेवक असतात. ते विद्यार्थ्यांना अवांतर वाचन, वैयक्तिक लेखन तसंच बँकिंग, एम.पी.एस.सी.सारख्या स्पर्धा परीक्षांना मदत करतात.
बरेचसे विद्यार्थी मुंबईच्या उपनगरातून मोठा प्रवास करून शिकायला मुंबईत येत असतात. काही तर गावाहून मुंबईत आलेले असतात. त्यांची बरेचदा मुंबईत राहण्याची सोय नसते. तसंच त्यांच्या जेवणाचेही हाल असतात. ही बाब लक्षात आल्यावर ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ने मुंबई विद्यापीठातील वसतिगृहात अपंगांसाठी दोन टक्क्यांचं आरक्षण मिळवलं आहे. विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षांच्या आयोजकांनी लेखनिकांच्या संदर्भात तयार केलेले नियमही अंध विद्यार्थ्यांसाठी जाचक ठरतात. कोणतीही परीक्षा देताना, ती देणाऱ्या अंध विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा लेखनिक एक वर्ग लहान असणं बंधनकारक आहे. ही अट योग्यही आहे; पण, स्पर्धापरीक्षा आयोजित करणाऱ्यांनी त्याला ‘लेखनिकाला 60 टक्केच गुण असावेत’, अशी अट घातली होती. यामुळे अर्ज करूनही अटींमध्ये बसणारे लेखनिक न मिळाल्याने कितीतरी विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसत. शिवाय मुंबईतल्या जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांना असे ‘साठ टक्के’वाले लेखनिक पुरवणं, ही तर खूप कठीण गोष्ट. हे लक्षात आल्यावर परिमला यांनी ही अट पाठपुरवा करून शिथिल करून घेतली.
बारावी आणि पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसमोरही अशीच अडचण होती. बोर्डाच्या परीक्षा असल्या की, अंध विद्यार्थ्यांना लेखनिकासाठीचा अर्ज महाविद्यालय आणि विद्यापीठ अशा दोन्ही ठिकाणी करावा लागत असे. त्यामुळे परीक्षेच्या दिवसातही त्यांना विद्यापीठ ते कॉलेज अशा खेपा घालाव्या लागत असत. कितीही अभ्यास केला तरी लेखनिक नसेल तर आपण परीक्षाच देऊ शकत नाही, याची जाणीव त्यांना असल्याने ते आदल्या दिवसापर्यंत ही धावपळ करत असत. यावर उपाय म्हणून ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ने महाराष्ट्र बोर्ड आणि विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांकडेच याबाबतचा अंतिम अधिकार असावा, यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवलं.
जागतिक स्वयंसेवक दिनी अंध विद्यार्थ्यांना स्वेच्छेने मदत करणा-यांचा सत्कार केला जातो. ‘स्नेहांकित हेल्पलाइन’मध्ये लेखनिक, वाचक, गाइड म्हणून येणारे स्वयंसेवक आणि त्यांची मदत घेणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांचं गेट टूगेदरही आयोजित केलं जातं. त्यामुळे स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांची एकमेकांशी ओळख होते. संपर्काचे मार्ग वाढतात आणि अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार त्यांना मदतही मिळते.
या वर्षाचं गेट टूगेदर मे महिन्यात पार पडलं आणि या दिवशी ‘स्नेहांकित सेंटर’ या नव्या प्रकल्पाचा शुभारंभही झाला. अंध विद्यार्थी मुंबईतल्या दूरदूरवरच्या कॉलेजांमधून शिकत असल्याने प्रत्येक ठिकाणी लेखनिक पाठवणं बरेचदा गैरसोयीचं होतं. अशावेळी हे विद्यार्थी ज्या कॉलेजांमध्ये शिकतात त्याच कॉलेजातले इतर विद्यार्थी त्यांना लेखनिक म्हणून मदत करू शकतात. हे लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेतला गेला. लेखनिक आणि वाचक म्हणून मदत करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांचं नाव, संपर्क आणि लेखनिक की वाचक म्हणून त्यांना काम करायला आवडेल, वगैरे माहिती विचारली जाते. ती या सेंटरमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे आगाऊ सूचना केल्यास दृष्टीहीन विद्यार्थ्यांला लेखनिक, वाचक उपलब्ध होतो. हे सेंटर अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात कार्यरत झालं असून हे सेंटर इतर कॉलेजेसमध्ये सुरू व्हावं म्हणून भवन्सचे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.
समाजात मिसळताना अंध विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्यांचं व्यक्तिमत्त्व उठावदार असावं, आत्मविश्वासाने भरलेलं असावं, त्यांचं इंग्रजी नीट असावं, याकडेही परिमला यांचं बारीक लक्ष असतं. जागेअभावी त्यांनी स्वत:च्या घरातच ब्रिटिश कॉन्स्युलेटतर्फे घेण्यात येणाऱ्या इंग्रजी परीक्षेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. अंधांसाठी असे एक ना अनेक प्रकल्प परिमला राबवतात. डोळस मुलांप्रमाणे कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस नसताना अंध विद्यार्थ्यांना दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळतं; पण ही मुलं कुठेही मागे राहू नयेत म्हणून अंध विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचंही त्यांनी ठरवलं आहे. गेली 28 वर्ष एअर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर वेल्फेअर या पदावर परिमला काम करत आहेत. त्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतील महिला विभागाच्या मानद सचिवपदाचीही जबाबदारी सांभाळतात. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या कौशल्याने सांभाळत असताना त्यांना अनेकांच्या मदतीची आवश्यकता असते. म्हणूनच ‘लेखनिक, वाचक म्हणून तुम्हीही या संस्थेत सहभागी होऊन माझी ताकद वाढवा’, अशी विनंती त्या कळकळीने करतात.