मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाचा मूळ स्त्रोत ठरलेले परळी वैजनाथ येथील आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करीत असल्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली.
परळी वैजनाथ- मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाचा मूळ स्त्रोत ठरलेले परळी वैजनाथ येथील आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करीत असल्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली. सरकारने ३० नोव्हेंबपर्यंत निर्णय घेतला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली २१ दिवसांपूर्वी परळी येथे आंदोलन सुरू झाले होते. परळीतील या आंदोलनाची धग राज्यभर पसरली. चाकण, नवी मुंबई, धुळे येथे हे आंदोलन अधिकच हिंसक बनले. अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. सरकार हे आंदोलन थांबावे, असे वारंवार आवाहन करीत होते. समन्वयकांना चर्चेला येण्याचेही निमंत्रण दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना जी चर्चा करायची असेल ती परळीत येऊन करावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली होती.
आंदोलनाची धग वाढल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने एक मागण्यांचे पत्रक मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेण्यात आली होती. राज्य सरकार करत असलेली मेगाभरती स्थगित करावी, मराठय़ांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये, कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी वाढवून द्यावा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजासाठी वसतीगृह उभारावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाशी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून संवाद साधत, मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपयर्ंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तोपयर्ंत मेगाभरतीही स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि परळीतील ठिय्या आंदोलनाचे नेते आबा पाटील यांनी स्वागत केले होते. त्यानंतर मंगळवारी ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.