भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौ-यात खेळाडूंना मैत्रीणाला सोबत घेऊन जाण्यास बीसीसीआयने बंदी घातली आहे.
नवी दिल्ली- इंग्लंड दौ-यात भारताच्या खेळाडूंनी सपाटून मार खाल्लानंतर आता बीसीसीआयच्या डोळ्यात काजवे चमकले आहेत. यापुढे भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौ-यात खेळाडूंना मैत्रीणाला सोबत घेऊन जाण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंदी घातली आहे.
इंग्लंड दौ-यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने त्याची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला बरोबर नेले आहे. बीसीसीआयने त्यांना एकाच ह़ॉटेलमध्ये थांबण्यासाठी नियमही शिथिल केल्याची चर्चा आहे. त्यातच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला ३-१ ने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यात कोहलीची कामगिरीही निराशाजनक राहिली. विराटने १० डावात अवघ्या १३४ धावा केल्या. यामुळेच बीसीसीआयने हा कठोर निर्णय घेतला आहे.
दौ-यादरम्यान यापूर्वी खेळाडूची पत्नी दौरा संपेपर्यंत त्याच्यासोबत रहात असे. मात्र आता काही दिवसच त्याच्यासोबत राहू शकेल, असा ठाराव करण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मैत्रीणीला सोबत घेऊन जाण्यास बीसीसीआयकडून मज्जाव करण्यात आला आहे.
एखादा खेळाडू सराव करू इच्छित असेल तरीही त्याची पत्नी अथवा मैत्रिण त्या खेळाडूसोबत फिरण्याचा हट्ट धरते. पत्नीसोबत खरेदीसाठी, भटकंती करण्यासाठी अधिक वेळ खेळाडू देत असल्याचे आढळून आले आहे. तसेच मैत्रिणींमुळे खेळाडूंचे मन विचलित होते. याचा थेट परिणाम खेळावर होतो, असे बीसीसीआयच्या आता लक्षात आले आहे.
इंग्लंड दौ-यात खेळाडूंना पत्नी आणि मैत्रिणीला सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी आणि गौतम गंभीर यांनी आपआपल्या पत्नीला सोबत घेतले. तर विराट कोहलीने मैत्रिण अनुष्का शर्माला सोबत घेतले. त्याचा काय परिणाम झाला ते नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात दिसल्याने बीसीसीआयने आता हा कठोर निर्णय घेतला आहे.