पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतक-यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने कर्जत तालुक्यातील भातशेती वाढू लागली आहे.
कर्जत- पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतक-यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने कर्जत तालुक्यातील भातशेती वाढू लागली आहे. मागील १५ दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, त्यातच पिकांवर कीड आणि रोगाची लागण होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, मागील आठवडय़ापासून वरुणराजाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी आनंदला आहे. या पावसामुळे किडीचा धोकाही कमी होण्याची शक्यता आहे.
पावसाने दडी मारल्यानंतर ज्यांना शक्य आहे अशा शेतक-यांनी जवळपासच्या नदी-नाल्यातून पंप लावून पाणी आणण्यासाठी तयारी केली होती. मात्र, अल्पभूधारक शेतक-याची चिंता वाढलेलीच होती. पावसाने दडी मारल्याने भातपिकांना किडीचा धोका निर्माण झाला. त्यामुळे कृषी विभागाकडून पिकांची पाहणी केली जात होती. उपाययोजनाही सुचवल्या जात होत्या.
राजनाला विभागातील शेतक-यांनी या नाल्यातून पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार केले होते. मात्र, पावसाने उशिरा का होईना कृपा केल्याने शेतकरी आनंदला आहे. गणेशोत्सवातही असाच पाऊस राहिल्यास भातपीक चांगले येऊ शकते, असे शेतक-यांनी सांगितले.