पिढयान्पिढया परंपरेनुसार चालत आलेल्या भुईबावडा येथील शिमगोत्सवाची ओळख जिल्हयात सर्वदूर आहे. परंपरेने चालत आलेले शिमगोत्सवातील वैश्य समाजाचा म्हानांड उत्सव पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवतात. कोकणातले प्रसिध्द लळीत नृत्य गावात परंपरेनुसार साजरे होते.
पिढयान्पिढया परंपरेनुसार चालत आलेल्या भुईबावडा येथील शिमगोत्सवाची ओळख जिल्हयात सर्वदूर आहे. परंपरेने चालत आलेले शिमगोत्सवातील वैश्य समाजाचा म्हानांड उत्सव पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवतात. कोकणातले प्रसिध्द लळीत नृत्य गावात परंपरेनुसार साजरे होते. देवदेवतांचे हुबेहुब देखावे, मशाल, घुमट वादय़, खिळखिळ, सोंग, रामायणातील कथा, खेळयांचा नाच यालाच म्हानांड या नावाने ओळखले जाते. परंपरेने चालत आलेली ही लळीत नृत्याची लोककला आजही गावक-यांनी जपली आहे. कोकणातील शिमगोत्वामधील काहीसे वेगळेपण भुईबावडा येथे असल्याने म्हानांडाला एक विशेष वेगळेपण आहे.
या उत्सवाची सुरुवात श्री रवळनाथ मंदिरातून श्री देव रवळनाथ व त्यांच्या अंगभूत असणारे देव देवतांची पालखी ढोल-ताशांच्या मिरवणुकीने होळीच्या मांडावर आणली जाते. गावातील वतनदार मंडळींच्या मानपानानुसार विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. पंचमीपासून सांस्कृतिक समाजबोधक, मनोरंजन करणा-या सोंगानी कार्यक्रमाला अधिकच रंगत येते. म्हानांडामध्ये मशाल, घुमट याला अधिक महत्त्व दिले आहे.
घुमट वादयाच्या तालावर खेळे मंडळी रामायणातील गोष्टी संगीत रूपाने सर्वासमोर सादर करतात. या खेळामध्ये संकासूर, गणपती, राधा, कृष्ण, शारदा, सरस्वती, जाभडे, माधवी, महादेव, नंदी, काप-या भट, हनुमंत, राम लक्ष्मण, सीता, बनबावरी, बनबावरा, ताटिका असे अनेक प्रकारची सोंगे वेगवेगळे मुखवटे व पेहराव करून नृत्य करत भाविकांना दाखवले जातात.
भुईबावडा गावातील ग्रामस्थ तसेच वैश्य समाजातील सर्व मुंबईकर मंडळी शिमग्यासाठी मोठया संख्येने उपस्थित असतात. प्रत्येकाला शोभेल असे पात्र देवून त्यानुसार काम केले जाते. भुईबावडा हा गावातील वार्षिके मानपानानुसार व वतनदारांच्या संगनमताने पार पाडली जातात. गावची एकी टिकवून ठेवण्यासाठी पूर्वजांनी गावातील ग्रामस्थामध्ये विशेष जबाबदारी देऊन मानपानानुसार हे हक्क शाबीत ठेवले आहेत. प्रत्येक जण परंपरेनुसार आपल्यावर असलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडत असतो. गावची एकजूट चांगली असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना ग्रामस्थांचा सहभागही उल्लेखनिय आणि मोठा असतो.
भुईबावडा गावामध्ये अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. परंतु शिमगा कधी येतोय याकडे अबाल वृद्ध, महिला, बच्चे कंपनी व मुंबईकर मंडळी वाट पाहत असतात. मांडावर पालखी आल्याचे समजताच माहेरवाशिणींची पावले माहेरी वळतात.
खणानारळाने देवीची ओटी भरली जाते. भुईबावडा येथील देवस्थानाची नवसाला पावणारा देव म्हणून सर्वदूर ख्याती आहे. नवसाच्या नावाने नारळांची तोरणे होळीला बांधली जातात. पंधरा दिवस नारळाची तोरणे होळीला बांधली जातात. या दिवसात होळीचा खांब भरुन जातो.
म्हानांडच्या या पंधरा दिवसांमध्ये स्थानिक ग्रामस्थ पालखीचे संरक्षण म्हणून पंधरा दिवस रात्रंदिवस मांडावर असतात. या उत्सवाची सांगता ही पारंपरिक खेळाने होते.
हा खेळही लक्षवेधी असतो. याला सरता खेळ असेही म्हटले जाते. या दिवशी संपूर्ण होळीचा मांड भाविकांनी फुललेला असतो. जिल्हाभरातून भाविक यावेळी उपस्थिती लावतात. तरुण पिढीचा उत्साह उल्लेखनिय असतो. पालखी नृत्य करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते. रवळनाथच्या नावाने चांगभलंऽऽ! या जयघोषाने पालखी मिरवणूक काढली जाते. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी परिसर गच्च भरून जातो.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालखीचे संरक्षण करण्यासाठी संकासुरांची भूमिका महत्वाची असते. शंभर स्वयंसेवकांना न जमणारे काम केवळ तीन संकासूर करत असतात. म्हानांडाची सुरूवात येथील दत्तमंदिरापासून केली जाते. यावेळीचा दिमाख उपस्थितांचे डोळे दीपवणारा असतो. येथील तरुण अनुभवाच्या जोरावर आगीच्या ज्वाला उडवत अग्नीज्वालांचा खेळ खेळतात. हे नृत्य काळजाचा ठोका चुकविते. पालखी व म्हानांड यांची भेट होताना ढोलताशांचा गजर, फटाक्याची आतशबाजी, गुलालाची उधळण, व शंकासुरांची मस्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत असते. पालखी मिरवणुकीने मांडावर आणली जाते. आणि म्हानांडचे अंतिम पर्व सुरू होते.
कोकणामध्ये ओळखले जाणारे लळीत नृत्य गावातील वैश्यवाणी समाज परंपरेनुसार सादर करतात. वेगवेगळया प्रकारची सोंगे आणून उपस्थितांचे मनोरंजन केले जाते. रामायणातील समाजबोधक गोष्टी नाटय़रुपाने सर्वासमोर मांडल्या जातात. त्यातच मनोरंजनासाठी अगदी गंमतशीर पात्रे खेळ करून दाखवतात. या खेळात तरुणाईचा उत्साह वाखन्याजोगे असतो. रात्रभर चाललेल्या या खेळामध्ये भाविकांना रात्रभर एकाच जागी खिळवून ठेवण्यात खेळयांना यश येते. खेळाचा शेवट ताटिका या सोंगाने होतो. ताटिका म्हणजे हा रामायणातील एक प्रसंग सादर होतो.
रामायणातील या भागातून गावात सुखशांतीचा संदेश दिला जातो. रावणाने रामाला मारण्यासाठी ताटिकेला पाठविलेले असते. ताटिका, राम- लक्ष्मण व वृद्धाचा पेहराव केलेला ब्राह्मण यांचे संपूर्ण नाटय़ या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य समजले जाते. यातच या कार्यक्रमाची सांगता होते. ग्रामस्थ या खेळाने भारावून जातात. चाकरमानी घरी परततात. मांडावरची गर्दी ओसरते. पंधरा दिवसांचा हा लोकोत्सव संपलेला असतो.