‘कौलारु हाय माझे घर, गावचे बंदरावरी’ असे पूर्वी आवडीने म्हटले जात असे. कारण कौलारु घराशिवाय पर्यायच नव्हता. मात्र, घरांच्या बदलत्या डिझाईनमध्ये तसेच महागाईच्या भस्मासुरात कौलांच्या वाढत्या दरांमुळे कौलाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पेण- ‘कौलारु हाय माझे घर, गावचे बंदरावरी’ असे पूर्वी आवडीने म्हटले जात असे. कारण कौलारु घराशिवाय पर्यायच नव्हता. मात्र, घरांच्या बदलत्या डिझाईनमध्ये तसेच महागाईच्या भस्मासुरात कौलांच्या वाढत्या दरांमुळे कौलाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. १० वर्षापूर्वीच्या काळात ग्रामीण भागात कौलांशिवाय घरच पाहायला मिळत नसे. मात्र, आजकाल कौलांऐवजी सिमेंटच्या पत्र्यांना अधिक पसंती मिळू लागल्याने कौलांचे अस्तित्व हद्दपार होऊ लागले आहे.
पेण तालुक्यातील धरमतर बंदर हे कौलांचे बंदर म्हणून ओळखले जायचे. रायगड जिल्ह्यात १०० वर्षापासून कौले मिळण्याचे ते एकमेव ठिकाण होते. मात्र आता धरमतरचे कौलांचे बंदर हे नावही इतिहासजमा होऊ लागले आहे.
सध्या महागाईच्या आगीत होरपळून निघालेल्या नागरिकांची घर बांधताना आर्थिक दमछाक होते. तसेच लाकडांची वाढती किंमत, मजुरीचे दर यामुळे नवीन आणि जुन्या घरांवरही सध्या कौलांऐवजी पत्रे टाकण्यात येत असल्याने कौलांची परंपरा इतिहासजमा होऊ लागली आहे.
१०० वर्षापूर्वीपासून पेण तालुक्यातील धरमतर बंदर हे कौलांचे बंदर म्हणुन ओळखले जायचे. याठिकाणी गुजरात व अन्य राज्यातून रस्त्याची सोय नसल्याने मोठ-मोठया मचव्यातून कौले येत असत. त्यानंतर दररोज ट्रकद्वारे कौले येऊ लागली. धरमतर बंदर जिल्ह्याचे मध्यवर्ती बंदर असल्याने येथे ग्राहक मोठया प्रमाणावर येत असत.
पूर्वी याठिकाणी चार व्यापारी कौलांचा व्यापार करीत होते. मात्र, कालांतराने कौलांची मागणी घटल्याने सध्या एकच पुजानी ब्रदर्स हे व्यापारी कौलांचा व्यापार करीत आहेत. त्याकाळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कौले धरमतर येथूनच जायची. त्यावर १२५ ते १५० कामगारांचा रोजगार होता. मात्र, आता घरांऐवजी इमारती व बंगल्यांमध्ये केवळ शोभेसाठी मोठी व छोटी कौले तेही लोणावळा विभागात थोडी-थोडी कौले विकली जात असल्याचे कौलांचे व्यापारी पुजारी ब्रदर्स यांनी माहिती देताना सांगितले.