बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज सर्व स्तरावर पोहोचवला
मुंबई – बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज सर्व स्तरावर पोहोचवला. बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या वाटचालीत बदल होत असून त्याला व्यावसायिक रूप येत आहे. त्यामुळे लेखणी गहाण न ठेवता, सत्याच्या मुळापर्यंत जाऊन पत्रकारितेची मूल्ये जपत पुढील वाटचाल केली तरच ख-या अर्थाने पत्रकार दिन सार्थ ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केल्या. ‘पत्रकार दिना’निमित्त ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
आपल्या प्रभावशाली लेखनाद्वारे समाजात बदल घडवून आणणा-या पत्रकारांना पत्रकार संघाच्या वतीने या समारंभात पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. बुधवारी सायं. ५.३० वा. आझाद मैदान येथील पत्रकार भवनात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे समारंभाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या समारंभाला प्रमुख वक्तेम्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार उपस्थित राहिले. पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सुरेश द्वादशीवार यांचा सन्मान केला.
या प्रसंगी पत्रकार संघाचे कार्यवाह प्रमोद तेंडुलकर यांच्यासहित कार्यकारिणीतील आदी सदस्य उपस्थित होते. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती आणि दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार’ दै. ‘प्रहार’चे उपसंपादक विनोद साळवी यांना देण्यात आला. उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कार’ गिरीश कुबेर (संपादक, दै. लोकसत्ता) यांना देण्यात आला. तर ललित लेखनाबद्दलचा ‘विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांना दिला गेला.
लेखनाची कल्पकता, पत्रकारितेतील अनुभव, वाटचाल या सगळ्याचे आज चीज झाले असल्याची भावना ह. मो. मराठे यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट राजकीय बातम्यांसाठीचा ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार’ संजय आवटे (संपादक, दै. सकाळ, मुंबई आवृत्ती) यांना प्रदान करण्यात आला. बदलत्या काळानुरूप माध्यमांचा चेहरा बदलत आहे. टीव्ही, ऑनलाईन, वृत्तपत्रे अशी माध्यमांची विविध रूपे समाजासमोर येत असून या माध्यमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे संजय आवटे यांनी सांगितले.
मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत स्तंभ आणि लिखाणासाठी दिला जाणारा ‘आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार’ राजेश सावंत (दै. पुढारी) यांना दिला गेला. या वेळी लेखणीद्वारे मुंबईच्या नागरी समस्यांना जी वाचा फोडली त्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल राजेश सावंत यांनी आभार व्यक्त केले. पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधत संघाची वाटचाल दर्शविणा-या दिनदर्शिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. तसेच यानिमित्ताने ‘मुंबई महानगरासमोरील आव्हाने’ हा उपक्रम हाती घेतल्याचे अमृतमहोत्सवानिमित्त स्थापण्यात आलेल्या समितीचे समन्वयक कुमार कदम यांनी सांगितले.
पुरस्कारामुळे समाजाप्रती जबाबदारीचे भान अधिक वाढले – विनोद साळवी
कष्टकरी आणि उपेक्षितांचा आवाज ‘चळवळींची शब्दास्त्रे’ या स्तंभातून दै. ‘प्रहार’चे उपसंपादक विनोद साळवी यांनी मांडला. आपल्या भावना व्यक्त करताना विनोद साळवी म्हणाले की, पत्रकारितेतील पितामह ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने मी कष्टकरी जनता आणि उपेक्षितांसाठी लिखाणाची चळवळ उभी केली. याची दखल पत्रकार संघाने घेत माझा पुरस्कार देऊन गौरव केल्यामुळे समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक झाल्याची जाणीव वाढली आहे.