केंद्र सरकारच्या भू-संपादन विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना या कायद्यातील वादग्रस्त कलमांबाबत खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
पुणे– केंद्र सरकारच्या भू-संपादन विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना या कायद्यातील वादग्रस्त कलमांबाबत खुली चर्चा करण्याचे आव्हान गुरुवारी दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भू-संपादन विधेयकावर खुली चर्चा करण्याचे आवाहन अण्णा हजारे यांना केले होते. त्यावर हजारे म्हणाले की, गडकरी यांचा गृहपाठ कच्चा आहे. आम्ही थेट पंतप्रधानांसोबत भू-संपादन विधेयकाबाबत खुली चर्चा करण्यास तयार आहोत.
ही चर्चाही कॅमे-यासमोर करा. त्यामुळे जनतेला ती थेट पाहता येऊ शकेल. त्यातून सत्य परिस्थिती उघड होईल. भू-संपादन विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र, राज्यसभेत सरकारपाशी बहुमत नसल्याने हे विधेयक रखडले आहे. या विधेयकाचा अध्यादेश ५ एप्रिलपर्यंत मंजूर न केल्यास तो रद्दबातल ठरणार आहे.
त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार आटापिटा करत आहे. कॉँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी या भू-संपादन विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी आहे.
त्यामुळे राष्ट्रपतींनी या विधेयकाबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे.