पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल राष्ट्रपतीभवनातून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राजकीय तज्ञांनी मंत्रिमंडळ फेरबदलासंबंधी या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तृणमुल काँग्रेस आणि द्रमुकच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक मंत्रीपदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसच्या कोटयातून मंत्रीपदे भरली जातात कि, मित्रपक्षांना प्रतिनिधीत्व दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कारण तृणमुल काँग्रेसने संपुआ सरकारची साथ सोडल्यानंतर कुठलाही नवा पक्ष संपुआमध्ये सहभागी झालेला नाही. समाजवादी पक्ष आणि बसपाने संपुआला बाहेरुन पाठिंबा दिला आहे.