पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाणी चंद्रभागेत मिसळत आहे.
पंढरपूर- विठूरायाच्या दारी भक्तांना घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाणी चंद्रभागेत मिसळत आहे.
आषाढी एकादशीला जेव्हा वारकरी चंद्रभागेत स्नान करायला जातील, तेव्हा दूषित आणि अस्वच्छ ड्रेनेजच्या पाण्यात स्नान करण्याची वेळ वारक-यांवर येणार आहे. घाण पाणी साठल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
एका बाजुला प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी कोटय़वधीचा निधी देत असताना प्रशासनाच्या गलथानपणामुळे देवाच्या दारातच भाविकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवासस्थानासह अनेक वास्तु स्वच्छ ठेवणा-या भारत विकास ग्रुपने विठ्ठल मंदिराला चकाचक बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नवनवीन अद्ययावत यंत्रांचे प्रशिक्षण मंदिर कर्मचा-यांना देण्यास सुरुवात केली आहे.
आषाढी वारी स्वच्छ बनवण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले असले तरी मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज फुटल्याने सर्व घाण पाणी घाटावरुन वाळवंटातून चंद्रभागेत मिसळत आहे. शिवाय वाळवंटात हे घाण पाणी साठून डबकी तयार झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.