पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई- पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याचे सांगतानाच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आदेश देताना प्रत्येक वाहनाची तसेच संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने देशभरातील प्रमुख शहर पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकमध्ये बेवारस बॅग
नाशिकच्या एम.जी. रोडवर एका कपाऊंडच्या जवळ बेवारस बॅग आढळून आली. या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. बॉम्बशोधक पथकाने ती बेवारस बॅग ताब्यात घेतली. दुपारी तीनच्या सुमारास ही बेवारस बॅग आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नाशिकमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याकूबच्या याचिकेवर आज सुनावणी
दिल्ली- १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. याकूब मेमनला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याकूबला ३० जुलैला फाशी देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात होणा-या सुनावणीत याकूबच्या फाशीचे भविष्य निश्चित होईल. दरम्यान, याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती द्यावी यासाठी अनेक खासदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रपतींकडे अर्ज केले आहेत.