मध्यरात्रीपासून समुद्र किनारपट्टी भागात सुटलेल्या वादळी वा-यांनी पुन्हा एकदा मच्छीमारीला ब्रेक लागला आहे.
रत्नागिरी– मध्यरात्रीपासून समुद्र किनारपट्टी भागात सुटलेल्या वादळी वा-यांनी पुन्हा एकदा मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. वेगवान वा-यांच्या भीतीने मासेमारी नौका किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांच्या आश्रयाला आल्या होत्या.
अनिश्चित हवामान, बंदीच्या काळात होणारी मासेमारी आणि मासेमारीवर परजिल्ह्यातील मच्छीमारांचे आक्रमण यामुळे मागील तीन ते चार वष्रे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडलेला असताना या वर्षीचा मासेमारी हंगामदेखील सुरुवातीपासून अनिश्चित हवामानाच्या फे-यात सापडला आहे. १५ ऑगस्टला मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी यावर्षीदेखील मासेमारी व्यवसायाला नैसर्गिक अडचणींचा सामना करीत आहे. हंगामाच्या प्रारंभी खोल समुद्रातील हवामान खराब झाल्याने अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका किना-यावरच उभ्या करून ठेवाव्या लागल्या होत्या. हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतरही मच्छीमारांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वादळी वारे सुरू झाले.
ताशी १० ते १५ कि. मी. वाहणा-या वा-यांच्या दहशतीपोटी मच्छीमारांनी रविवारी आणि सोमवारी मासेमारीकरिता समुद्रात लोटलेल्या नौका माघारी बोलावल्या. मंगळवारी पहाटेपासून रत्नागिरीतील प्रमुख बंदरांवर मच्छीमारी नौकांनी आश्रयाकरिता गर्दी केली होती. ऐन हंगामात वातावरणाच्या लहरीपणाचा चौथ्यांदा मासेमारीला फटका बसला आहे. यापूर्वी हंगामाच्या प्रारंभीच सोसाटय़ाच्या वा-यांनी अनेकवेळा मासेमारी ठप्प झाली होती.
वातावरणातील अनिश्चिततेचा मत्स्योत्पादनावर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून मोसमारीकरिता समुद्रात गेलेल्या नौका माघारी परतल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला होता. बाजारातील उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडले होते. मागणी असलेल्या मासळीचा बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. सुरमई, तोवर, बांगडा, पापलेट, संरगा आदी मासळीची चढय़ा दराने विक्री होत होती. वातावरणातील बदलाचा मत्स्योत्पादनावर प्रतिकुल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचे मत्स्योत्पादन गेल्या काही वर्षामध्ये ३५ टक्क्यांनी घटले आहे.
गेल्या तीन वर्षातील मत्स्योत्पादनाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार २००६-०७ मध्ये १ लाख ९ हजार ५५ मेट्रिक टन इतके उत्पादन होते. या काळात १ ऑगस्ट ०७ मध्ये मासेमारीवरील बंदी उठवण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणावर मासेमारी झाली. त्याचा परिणाम पुढील दोन वर्षावर झाला. सन २००७-०८ मध्ये हे मत्स्योत्पादन ८५ हजार ९९ मेट्रिक टनवर आले आणि त्यानंतरच्या काळात म्हणजेच सन २००८-०९ मध्ये मत्स्योत्पादनात आणखी घट होऊन ते ७२ हजार ३५८ मेट्रिक टनवर आले. २००९-१० या वर्षात मत्स्य उत्पादन ७५ हजार १२२ मेट्रिक टन उतके होते, २०१०-११ वर्षात मत्स्य उत्पादनात वाढ होऊन मत्स्य उत्पादन ९५ हजार ५९० मेट्रिक टनापर्यंत पोहोचले मात्र त्यानंतरची पुढील दोन वष्रे मच्छीमारांसाठी सामान्यच गेली आहेत. २०११-१२ वर्षात ८८ हजार ४३३ मेट्रिक टन तर २०१२-१३ वर्षात ८७ हजार ६९० मेट्रिक टन इतके मत्स्योत्पादन झाले आहे.