लंडन- प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचे निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात व्ही. एस. नायपॉल यांनी ३०पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. २००१ मध्ये नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारही मिळाला.
नायपॉल यांचा जन्म कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदाद या देशात झाला होता. नायपॉल यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश साहित्याची पदवी घेतली होती. त्यांच्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीला १९७१ मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नायपॉल यांनी आपल्या कारकिर्दीतील लिखाणामुळे त्यांना २०व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले.
नायपॉल यांनी लिहिलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंब-या खूप प्रसिद्ध झाल्या. भारतीय वंशाचे ते लेखक होते. भारतातील एका पिढीवर त्यांच्या लिखाणाची छाप होती. दिलिप चित्रे, नामदेव ढसाळ यांच्यामुळे त्यांना मुंबईचा अभ्यास करता आला.
आंग्ल जाणिवेचा, भारतीय वंशाचा लेखक
विवेक कृष्णा कांबळे – नायपॉल यांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काहीसा ‘साहेबी’ थाटाचाच होता. ते गांधींचे कट्टर विरोधक होते. ते गांधींची निर्भत्सना, ‘फाटक्या वेशातील फकीर’ अशी करत. पण, याच नायपॉल यांना मुंबईवर काहीतरी लिहायचे होते. त्यांनी दिलीप चित्रेंच्या माध्यमातून नामदेव ढसाळ यांना गाठले. त्यांच्याबरोबर कामाठीपुरा आदी परिसर पाहिला. तिथल्या अनेक महिलांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांनी ‘इंडिया : ए मिलिनियन म्युटिनिज नाऊ’ लिहिले.
इंग्रजी ही जागतिक भाषा. या भाषेत अनेक शब्द, शब्दप्रयोग प्रविष्ठ झाले ते वेगवेगळ्या देशातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या साहित्यामुळे. साहित्याचा प्रांत समृद्ध करण्याचे महत्त्वाचे कामही या लेखकांनी केलेले आहे. त्यात विद्याधर नायपॉल अर्थात व्ही. एस. नायपॉल यांचा उल्लेख करावाच लागेल. हा आंग्ल जाणिवेचा, भारतीय वंशाचा लेखक होता. त्यांच्या साहित्यातून ही बाब प्रकर्षाने मुकर झालेली आहे.
काही वर्षापूर्वी भारतातले अनेक ऊसतोड कामगार दक्षिण आफ्रिकेत गेले. नायपॉल यांचे नातेवाईकही असेच दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथेच स्थिरावले. नायपॉल यांचे वडील सुरजप्रसाद नायपॉल हे भारतीय नागरी सेवांमध्ये अधिकारी होते. नायपॉल यांचा जन्म त्रिनिनादचा. नायपॉल यांनी लिहिलेल्या साहित्याला ब्रिटिश नागरिकांनी डोक्यावर घेतले. १९७१ मध्ये त्यांच्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीला बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक कादंब-या लिहिल्या. वास्तवाला भिडणारे लेख, प्रवासवर्णने लिहिली आहेत. इराण, इराक, पाकिस्तान, तुर्की यांसारख्या कायम धगधगत्या मुस्लीम राष्ट्रांमध्ये राजकीय अस्थिरतेच्या काळात भ्रमंती करून या देशांची शीतयुद्धामुळे झालेली अवनत अवस्था जगासमोर आणली होती. नायपॉल त्यांच्या इस्लामविषयक मतांमुळे कायम वादाच्या भोव-यात अडकले. नायपॉल यांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काहीसा ‘साहेबी’ थाटाचाच होता. ते गांधींचे कट्टर विरोधक होते. ते गांधींची निर्भत्सना, ‘फाटक्या वेशातील फकीर’ अशी करत. पण, याच नायपॉल यांना मुंबईवर काहीतरी लिहायचे होते. त्यांनी दिलीप चित्रेंच्या माध्यमातून नामदेव ढसाळ यांना गाठले. त्यांच्याबरोबर कामाठीपुरा आदी परिसर पाहिला. तिथल्या अनेक महिलांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांनी ‘इंडिया : ए मिलिनियन म्युटिनिज नाऊ’ लिहिले. मुंबईचे जगणे, त्याचे पोत आदी सगळेकाही या पुस्तकात आलेले आहे. एका ब्रिटिशाचा भारताची एकूणात व्यवस्था कशी आहे, याचे निष्कर्ष यातून आविष्कृत झालेले आहेत. या कादंबरीचाही मोठाच बोलबाला झाला.
ऑक्सफर्डमधून इंग्रजीमध्ये पदवी मिळवणारे नायपॉल भारतात तीनदा आले होते. १९६९ साली त्यांनी लिहिलेले ‘इंडिया अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ यावर भारतातून प्रचंड टीकाही करण्यात आली होती. ‘अ हाऊस ऑफ मिस्टर बिश्वास’ (१९६१) ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली. कॅरेबियन देशांमध्ये होणारी भारतीय स्थलांतरितांची घुसमट त्यांनी या कादंबरीत मांडली होती. ३० पुस्तके लिहिणा-या नायपॉल यांच्या एकूणच साहित्यिक कारकिर्दीसाठी त्यांना २००१ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय वंशाच्या नायपॉल यांनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते. एक लेखक आणि व्यक्ती म्हणून नायपॉल कायम वादग्रस्त ठरले. ‘जो वाद निर्माण करत नाही, तो लेखक नाहीच’ असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. नायपॉल यांची काही विधाने वादग्रस्त होती. ते त्या मतांवर ठाम असत. त्यातून ते अनेकदा वादही ओढावून घेत असत. पण, असे वाद निर्माण करण्यात त्यांना वेगळी मजा येत असे.
नायपॉल मराठी रसिकांना फारसे माहीत असण्याचे कारण नाही. त्यांचे साहित्य वाचले नाही, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले अशातलाही भाग नाही. पण, नायपॉल हे ब्रिटिश मस्तीत जगले. त्यातून ते अनेकदा वादग्रस्तही ठरले. पण, त्यांनी आपल्या शब्दाला कधी झुकू दिले नाही. नायपॉल यांनी मध्यपूर्वसह बराच भाग आपल्या साहित्यातून आणला. हे त्यांचे देणेच आहे. नायपॉल आपल्यात नसतील, पण त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून ते कायमच स्मरणात राहतील.
भारतीय वंशाच्या मुल्कराज आनंद, आर. के. नारायण, राजा राव, मनोहर माळगावकर, बबानी भट्टाचार्य, विक्रम सेठ, अरुंधती रॉय, अनिता देसाई, अरविंद अडिगा, किरण देसाई, चेतन भगत या इंग्रजी भाषेत लिहिणा-या लेखकांची नावे आपल्याला माहीत आहे. त्यात नायपॉल यांचेही नाव धृवता-यासारखे अढळ आहे. लेखक कधी मरत नसतो, असे म्हणतात. नायपॉल हे मरणारे लेखक नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या साहित्यातून जिवंतच राहणार आहेत, यात तीळमात्र शंका नाही.