नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीलाच गळती लागली आहे.
नेरळ – नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पाणी साठवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने टाकी बांधली आहे. मात्र सद्यस्थितीत या पाण्याच्या टाकीलाच गळती लागली आहे. सडलेल्या लोखंडाची टाकीतील पाणी दूषित होण्याची शक्यता लक्षात घेता, ही टाकी तात्काळ बदलावी, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवाशी संघटनेने केली आहे.
नेरळ स्टेशनवर फलाटाबाहेर एका बाजूला पाण्याची साठवण टाकी आहे. ३०-४० वर्षे जुन्या असलेल्या या पाण्याच्या साठवण टाकीतून गेल्या काही महिन्यांपासून पाणी गळती सुरू आहे. पाणी साठवण टाकी लोखंडी असल्याने गंजलेल्या टाकीत साठून राहणारे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. हे पाणी पिऊन प्रवाशांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ साठवण टाकी बदलावी, अशी मागणी गेले काही दिवस प्रवाशी करत होते. या तक्रारींची दाखल घेऊन नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन नेरळ स्थानकातील पाण्याची टाकी बदली करण्याची मागणी केली आहे.