नेरळ गावातील नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होत आले असले तरी कंत्राटदाराने दोन्ही बाजूकडील रस्ते पुलाला जोडलेले नाहीत.
नेरळ- नेरळ गावातील नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होत आले असले तरी कंत्राटदाराने दोन्ही बाजूकडील रस्ते पुलाला जोडलेले नाहीत. त्यात पावसाळा सुरू झाल्याने या पुलावरून वाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
नेरळ गावातून वाहणारे सांडपाणी ज्या नाल्यातून उल्हास नदीला जाऊन मिळते आणि माथेरानच्या डोंगरांतून वाहून येणारे पाणी ज्या ओहळातून उल्हास नदीत जाते, त्या नाल्यावर पूल बांधण्यात येत आहे. या पुलासाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाने ६० लाखांचा निधी दिला आहे. ४० मीटर लांबीच्या आणि ७ मीटर रुंदीच्या या नेरळ-खांदा पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने जुना रस्ता जोडण्याचे काम करणे आवश्यक होते, मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नाल्यात बनवण्यात आलेल्या कच्च्या रस्त्याने सध्या वाहतूक सुरू आहे. मोठा पाऊस झाला तर माथेरानच्या डोंगरातून वाहून आलेल्या पाण्यात हा रस्ता वाहून जाईल, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
त्यामुळे नवीन पूल रस्त्याला न जोडल्यास नेरळ खांदा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, तात्काळ कंत्राटदाराला सूचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.