मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/07/wall-collapse.jpg)
रायगड – मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली.
रायगड जिल्ह्यात नेरळमधील मोहाचीवाडी या गावात ही दुर्घटना घडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास दिघे कुटुंबातील सर्व जण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली.
किसन दिघे, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा स्वप्नेश, मुलगी अर्चना आणि आई जया बाई या पाच जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. माथेरान या प्रसिध्द पर्यटनस्थळी ज्या नेरळमधून जावे लागते तेथील गावात ही दुर्घटना घडली.
रायगड जिल्हा कोकण पट्ट्यात येतो. मागच्या पाच दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरही दरड कोसळून काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. मातीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर संध्याकाळी या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.