नेरळकरांची इच्छा असल्यास येत्या सहा महिन्यांत नगरपंचायत स्थापन करण्याची तयारी राज्य सरकार करेल, असे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
नेरळ- मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या नेरळचा विचार करता, भविष्यात विकासासाठी ग्रामपंचायत पुरेशी नाही. त्यामुळे नेरळकरांची इच्छा असल्यास येत्या सहा महिन्यांत नगरपंचायत स्थापन करण्याची तयारी राज्य सरकार करेल, असे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
‘नेरळ महोत्सवा’च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात तटकरे बोलत होते. नेरळमध्ये नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात राबवता येणार नाहीत. गावाचे शहरात रूपांतर होणे गरजेचे आहे. त्यासाठी नेरळकरांनी मागणी केल्यास नगरपंचायत किंवा नगर परिषद सुरू करण्याची कार्यवाही राज्य सरकार करेल. माथेरान, कर्जत, खोपोली या तीन नगर परिषदांना दीडशे कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. नेरळचाही विकास मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश टोकरे उपस्थित होते.