दोन गटांत झालेल्या हाणामारीवरून नेरळमध्ये ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
नेरळ – दोन गटांत झालेल्या हाणामारीवरून नेरळमध्ये ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला तणाव निवळला आहे. उत्सवकाळात धार्मिक सलोखा राखण्यासाठी नेरळ पोलिसांनी स्थानिक पातळीवरील हिंदू व मुस्लीम समाजातील नेतेमंडळींशी चर्चा केली.
सोमवारी दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे. दोन गटात झालेल्या या राड्यामुळे धार्मिक वातावरणही बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याने रायगड पोलिसांनी नेरळ परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
दोन गटांत उसळलेल्या या दंगलीनंतर बुधवारी नेरळ बाजार पेठ आणि दामत आणि भडवळ गाव परिसरात तणावपूर्ण शांतता होती. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी बुधवारी नेरळ पोलिसांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सावळाराम जाधव, एकनाथ धुळे, उत्तम कोळंबे, राजेश जाधव, बालाजी विचारे, पुंडलिक शिनारे तसेच माजी सरपंच असगर खोत, मुजल्लिम नत्रे, परवेज आढाळ, मुन्ना नत्रे आदी उपस्थित होते. दरम्यान दंगलप्रकरणी गाडय़ांची मोडतोड, तलवारीने हल्ला, जमावबंदीचा आदेश मोडल्याने १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.