कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेची नेरळ येथील कन्याशाळेची दुरवस्था झाली आहे.
नेरळ- कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेची नेरळ येथील कन्याशाळेची दुरवस्था झाली आहे. शंभर वर्षे झालेल्या या शाळेच्या दुरुस्तीची गरज असून पावसाळ्यात या शाळेत वर्ग भरवण्यात धोका आहे. त्यामुळे नव्याने सुरू होणा-या शालेय वर्षात वर्ग कुठे भरवावेत, असा प्रश्न आहे. जुन्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधण्याची मागणी शाळा व्यवस्थापनेकडून केली जात आहे.
नेरळमधील चावडी कार्यालयामागे असलेली जिल्हा परिषदेची कन्या शाळा इमारत १९१५ मध्ये बांधण्यात आली. कौलारू असलेली ही इमारत चार खोल्यांची आहे.
मात्र, काळाच्या ओघात ही शाळा आता धोकादायक झाली आहे. जमिनीची फरशी खाली बसली आहे. तर जवळपासचा परिसर उंच झाला आहे. शाळेच्या इमारतीबाहेर असलेला रस्ता किमान तीन फूट उंच आहे. त्यामुळे सखल भागातील शाळेत पावसाळ्यात पाणी भरते.
शाळा व्यवस्थापन समितीने पाच वष्रे जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीला सातत्याने लेखी स्वरूपात शाळेच्या दुरवस्थेबाबत माहिती कळवली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. या शाळेत २०० हून अधिक विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. मात्र, इमारत नसल्याने यंदाच्या शालेय वर्षात या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेच्या दुरवस्थेबाबतचे सर्व अहवाल शाळेच्या मुख्याध्यापक उषा नेटके यांनी वरिष्ठ कार्यालयास दिले आहेत. तरी देखील प्रशासन ढिम्म असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या विषयाबाबत शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत केवळ चर्चा झाल्या आहेत. ठोस उपाय झालेला नाही.
– राजश्री सावंत, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थिनींना बसवणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.
– सुभाष नाईक, उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
आम्हाला शाळेच्या दुरवस्थेची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तेथे नवी इमारत बांधावी यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने यापूर्वीच ठराव दिला आहे.
– राजश्री कोकाटे, सरपंच, नेरळ