आमच्या करपलेल्या पिकांच्या व उजाड रानाच्या किती वेळा पाहण्या करणार? तेच पाहणी पथक, तेच अधिकारी आणि पाहणी केलेल्या जागाही त्याच आहेत.
उस्मानाबाद/लातूर- आमच्या करपलेल्या पिकांच्या व उजाड रानाच्या किती वेळा पाहण्या करणार? तेच पाहणी पथक, तेच अधिकारी आणि पाहणी केलेल्या जागाही त्याच आहेत. आता पाहण्या बस्स झाल्या! मदत कधी देणार ते बोला, अशा शब्दांत लातूर उस्मानाबादमधील शेतक-यांनी केंद्रीय पाहणी पथकांच्या अधिका-यांना सुनावले. काही शेतकरी तर अधिका-यांच्या अंगावर धावून गेले.
मात्र कडक पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना अधिका-यांपर्यंत पोहोचता आले नाही. मदतीच्या आश्वासनाऐवजी केंद्रीय पथकाने धीर धरा, असे कोरडे आश्वासन दिल्याने शेतकरी नाराज झाले.
खरिपानंतर आता रब्बीची पिकेही हातून गेली. त्यामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तात्काळ मदत देऊन आधार देण्याऐवजी केंद्रीय पथकामार्फत वेळोवेळी पाहणीचा फार्स केला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यासाठी पोलीस फौजफाटय़ासह आलेल्या पथकाला शनिवारी औसा तालुक्यातील बिरवली पाटी आणि उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बीड जिह्यात शुक्रवारी पाहणी पथकाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लातूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याचे लक्षात येताच शुक्रवारी रात्री हे पथक लाल दिवे बंद करून लातूर जिल्ह्यात गुपचूप दाखल झाले. त्यानंतर शनिवारी औसा तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी केली तेव्हा पथकाला शेतक-यांच्या संतापाचा सामना करावा लागला.
हे पथक आज लातूर जिल्ह्यातून औसामाग्रे उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दी येत असताना सुरुवातीला बिरवली पाटीजवळ शेतक-यांनी या पथकाची गाडी अडवली. नंतर हे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणीकडे रवाना झाले. पथक दाखल होताच शेतक-यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या ताफ्याला रोखले. विशेष म्हणजे येथे बंदोबस्त असतानाही शेतकरी थेट अधिका-यांना भिडले.
मागच्या वेळी ऑगस्टमध्ये ज्या ठिकाणी केंद्रीय पथकाने पाहणी केली. त्याच ठिकाणची पाहणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. तेच अधिकारी, त्याच जागा आणि तीच आश्वासने किती दिवस ऐकायची, असा सवाल शेतक-यांनी केला. यावेळी थोडी धक्काबुक्की झाली. दुष्काळी पाहणीऐवजी जलयुक्त शिवार अंतर्गत झालेली कामे अधिका-यांनी पथकाला दाखवली. त्यांनतर हे पथक हाडोंग्रीकडे रवाना झाले.
हाडोंग्री येथे मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी पाहणी केलेल्या चारा छावणीची पाहणी करून हे पथक पारगावकडे गेले. पारगावमध्ये या पथकाने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मदतीबद्दल बोलण्याऐवजी धीर धरा, एक महिन्यात पाऊस पडेल, असे सांगून शेतक-यांच्या भावनांची खिल्ली उडवली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यानंतर लगेचच पथकाने तेथून काढता पाय घेतला.
या पथकामध्ये केंद्रीय कृषी विभागाचे एस. के मल्होत्रा, आर. पी. सिंग हे दोन अधिकारी होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारवनरे, महसूल, कृषि, जिल्हा परिषद अशा विविध खात्यांच्या अधिकार्याचा प्रचंड ताफा पथकाच्या व्यवस्थेसाठी हजर होता. विशेष म्हणजे या पथकाने आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची साधी चौकशीही केली नाही.